स्वातंत्र्योत्तर काळात गिरण्यांची संख्या वाढू लागली. सन १९८२पर्यंत मुंबई शहरात ६० गिरण्या कार्यरत होत्या. सन १९७०पासून या व्यवसायास चांगलीच सुबत्ता आली होती. गिरण्यांचा विस्तार होत होता. त्यामुळे गिरण्यांचं शहर अशी मुंबईची ओळख झाली.
दादरपासून भायखळा आणि शिवडीपासून वरळी या भागाला गिरणगाव म्हणून संबोधलं जात असे. गिरण्यांची ६०० एकर जागा, अडीच ते तीन लाख गिरणी कामगार यामुळे मुंबईतील प्रत्येक घराचा गिरण्यांशी संबंध येत होता. गिरणीतील जॉबर, कारकून हा जसा गिरणीत प्रतिष्ठित होता, तसा तो जिथे राहत होता, त्या चाळीतदेखील त्याला प्रतिष्ठा मिळत होती.
त्यावेळी रस्त्याने चालताना आकाशाकडे पाहिलं, तर गिरण्यांची उंच धुरांडी दिसायची. यातच गिरणगावातील लोकांची रोजगार आणि जगण्याची साधनं निर्माण झाली होती. गिरण्यांच्या तिन्ही पाळ्या चालू असत, तेव्हा गिरण्यांचे भोंगे हेच घड्याळ होतं.
त्या सुमारास दत्ता सामंत हे कामगार नेते म्हणून उदयास आले होते. सन १९८१च्या दिवाळीत बोनसवरून कामगारांची निराशा झाली होती. वेतनवाढ, बदली कामगारांचा प्रश्न हे मुद्दे होतेच. कामगार अक्षरश: धुमसत होते. सामंत यांनी आपल्यासाठीही लढा द्यावा, असं गिरणी कामगारांना वाटलं आणि सामंत यांनी कामगारांच्या आग्रहास्तव सन १९८२चा संप केला. सामंत यांच्या महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली हा संप झाला, त्यास काही डाव्या संघटनांचा पाठिंबा होता. १८ जानेवारीपासून या संपाची हाक देण्यात आली होती. परंतु, कामगार एवढे उत्तेजित झाले होते की, १७ तारखेची दुसरी पाळी संपल्यानंतरच सर्वजण संपावर गेले, रात्रपाळी झालीच नाही. एकूण अडीच लाख कामगार यात सहभागी झाले. सामंत यांनी गिरणी मालकांकडे तब्बल ५०० रुपये वेतनवाढीची मागणी केली होती.
सुरुवातीचे ६ महिने कामगारांची एकजूट होती. मात्र, यातील बहुतांश कामगार हे या नोकरीवरच अवलंबून होते. अन्य नोकरी-व्यवसायसंबंधी कुशलता त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे यातील अनेकांचा धीर खचला. हा संप चिघळतोय हे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नेते एस. एम. जोशी व गुलजारीलाल नंदा यांनी पुढाकार घेऊन ४५ ते ७५ रुपये मासिक वेतनवाढीचा प्रस्ताव कामगार संघटनांपुढे ठेवला. (त्यापूर्वी कम्युनिस्ट नेते श्रीपाद डांगे यांच्या नेतृत्वाखाली सन १९७४मध्ये गिरणी कामगारांचा ४० दिवस संप झाला होता व मासिक चार रुपये वेतनवाढ मंजूर झाल्यानंतर डांगे यांनी संप मागे घेतला होता.