फुलपाखरू "इतके इतके पाणी गोल गोल राणी""ये दरवाजा तोडेगा; शिपाईदादा बोलेगा!" परसात मुलांचा खेळ रंगला होता.साऱ्या मुलांनी गोल गोल रिंगण धरल होत.रिंगणाच्या आत मध्यभागी गंधाली दोन्ही हात कमरेवर ठेऊन उभी होती.आपण सहजच त्या मुलांचं कड तोडून बाहेर पडू , असा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर होता.अचानक गंधालीने मुसंडी मारली व तिच्या डावीकडच कड तोडून ती झपकन बाहेर पळाली.सारी मुले गंधालीच्या पाठीमागे तिला पकडण्यासाठी धावत सुटली. तेवढ्यात घरातून आवाज आला..."अग, ए गंधाली...लवकर ये जरा."" छट,कधी म्हणून खेळू द्यायची नाही आई!येते ग.." गंधाली हिरमुसली होत धावतच घरात गेली." काय ग आई?अंग...थोड वेळ खेळू दिल असतस तर...!"" आता कसली खेळतेस? जा अनुसया काकींकडून आवळ्याच लोणचं घेवून ये."अनुसया काकीकडे जायचं म्हणून गंधाली खूष झाली.अनुसया काकीबद्दल तिला खूप कुतूहल होत.तिचा नवरा काही वर्षांपूर्वी संन्याशांबरोबर गुपचूप निघून गेला तो पुन्हा आलाच नाही. पण अनुसया काकींना अजून आशा आहे तो परतून येईल म्हणून. ती फारशी कुणाशी बोलत नाही. पण गंधालीबरोबर मात्र मनमोकळेपणे बोलायची.ओट्यावरच्या झोपाळ्यावर बसून झोका घेता घेता सुरेल गाणी म्हणायची.तिचा एकूलता एक मुलगा पुण्याला मामाकडे शिकायला होता.एवड्या सुंदर व चांगल्या पत्नीला सोडून तिचा नवरा का गेला हे कोड गंधालीच्या बालमनाला पडला होता.एकदा तिने आईच्या तोंडून ऐकल होत की अनुसयाकाकी आपल्या नवर्यासोबत व शेजार्यांसोबत सतत भांडायची.रोजच्या भांडणाला कंटाळून तो संन्यासी बनला होता.पण त्यानंतर अनुसया कोणाशीही भांडली नाही. घराबाहेरही ती फारशी पडत नसे. गंधालीला नेहमी वाटे की तिच्या नवर्याने परतून यावे व बदलेल्या अनुसयाकाकींना पहावे...गावात कुणी संन्यासी आला तर की अनुसयाकाकींच्या जीवाची घालमेल व्हायची. दाराकडे डोळे लावून बसायची.पण नेहमीच तिच्या पदरी निराशा यायची. गंधाली धावतच अनुसयाकाकींच्या घरी गेली.काकी झोपाळ्यावर बसून " नाच नाचूनी अती मी दमले थकले रे नंदलाला" हे गाण गुणगुणत होती. गंधाली तिच्या जवळ गेली तरी तिला जाणीवही नव्हती. गंधाली झोपाळ्याच्या बाजूला उभी राहीली. चाहूल लागल्याने काकूंनी डोळे उघडले.गालावरची आसवे पुसत त्या म्हणाल्या... "अग.गंधाली कधी आलीस? मुंबईला कधी जाणार?"" काकूं...आईनं आवळ्याच्या लोणच्याची आठवण करायला सांगितलय."" केव्हाच भरून ठेवलय...आणून देते हो."अनुसयाकाकीं घरात गेल्या.गंधाली झोपाळ्यावर बसून हलके हलके झोका घेवू लागली.एवड्यात काकीं आतून लोणचं घेवून आल्या. " काकू..; मोगर्याची फूल काढू?"" काढ ...ना..पाहिजे तेवढी काढ.मुंबईत कुठ मिळतील तूला!"" काकू मला मुंबईला जायचंच नाही. "काकीं मंद हसल्या. गंधालीच्या खांद्यावर थोपटून म्हणाल्या....."अग, आपल्याला हव असत ते कधी मिळतंच नाही....आपण जे ठरवतो ते घडतच अस नाही. "गंधाली धावतच मोगरीच्या मांडवाखाली गेली.पांढरे शुभ्र टपोरे कळे हळूवारपणे काढत परकराच्या ओच्यात भरू लागली. रात्री काळ्यांच्या दोन वेण्या बनवायच्या एक आईसाठी व एक आपल्यासाठी. ऊद्या मुंबईला जाताना माळायला मिळतील. खर म्हणजे गंधालीला मुंबईला जायचंच नव्हते. तिने तसा हट्ट धरला होता.आजीकडे राहीन अस म्हणत होती.पण आई ऐकायलाच तयार नव्हती.इथल्या मैत्रिणी,फुल,नदीत डुंबणे...आजीच्या कुशीत झोपणे हे सार मुंबईला मिळणार नव्हते.म्हणून ती उदास होती.सकाळी उठल्यावर पारिजातकाचे फुले वेचताना, 'घनःश्याम सुंदर श्रीधरा 'ही काकींची भूपाळी कशी ऐकायला मिळणार? आजोबांच्या बैलगाडीतून पारावरच्या मारुतीला दर शनिवारी जायची गंमत पुन्हा किती दिवसांनी मिळणार कुणास ठाऊक? बैलाच्या गळ्यातील धुंगराच्या तालावर दौडत निघालेल्या बैलगाडीतून फिरण्याची गंमत,रेल्वे व बस प्रवासात मिळणार का? असे अनेक प्रश्न तिला पडले होते.उद्या मुंबईला जायचे या कल्पनेने ती उदास झाली होती.फुले काढून झाल्यावर ती लोणच्याची बरणी घेऊन जाताना म्हणाली,"येते ग काकू.."" ये..हो..आणि मुंबईला गेल्यावर विसरू नको या काकूला"" नाही विसरणार काकू.."गंधाली रडवेल्या आवाजात म्हणाली. दुसर्या दिवशी मुंबईला जाण्यासाठी सारे पहाटे घराबाहेर पडले.गंधाली जातेय म्हणून आजी आजोबा व्याकूळ झाले होते.गंधाली रडतच आजीच्या कुशीत शिरली." जा बाई; अभ्यास व्यवस्थित कर...आईला त्रास देऊ नकोस" आजी तिला थोपटत म्हणाली.---------*----------------*--------*------------*------'रमुंबईच्या पहिल्या दर्शनाने गंधाली हबकली. उंच उंच इमारती..गाड्यांची पळापळ...लोकांची प्रचंड गर्दी....माणसे नव्हेत मुंग्या पळताहेत...! असंख्य आवाजांच्या गर्दीत हरवलेली शांतता.भेदरलेल्या मनानं गंधाली ह्या नव्या विश्वात शिरली. तिच्या बांबांची खोली गावातल्या गोठ्याएवडीसुद्धा नव्हती.आपली आई , बाबांजवळ मुंबईला जाण्यासाठी का हट्ट घरात होतो हेच गंधालीला कळत नव्हते.इथे सगळीकडे इमारतीच इमारती होत्या.बिल्डींगमधल्या सार्या खोल्यांची दार बंद होती.आत माणसं आहेत की नाही हेही कळत नव्हते. गावी तर आजी घराचा दरवाजा दिवसा कधिही बंद करायला द्यायची नाही. म्हणायची,भरल्या घराचा दरवाजा दिवसा बंद करायचा नसतो. पहिल्याच दिवशी संध्याकाळी गंधाली खिडकीजवळ उभी होती. खाली चार पाच बिल्डिंगच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत मुले वेगवेगळे खेळ खेळत होती.तिला सारेच अजब वाटत होते.कुणी क्रिकेट खेळत होत,काही बॅडमिंटन तर काही मुल नुसतीच इकडून तिकडे धावत होती.गंधालीला वाटल आपणही खाली जावं.तिथल्या मुलांसोबत खेळाव . आईची परवानगी घेऊन गंधाली खाली गेली.आल्यापासून गंधालीच्या उदास चेहर्याकडे पाहून आई काळजीत पडली होती.त्यामुळे गंधाली खेळायला जाते म्हटल्याबरोबर तिने झटकन परवानगी देऊन टाकली.एक-दोन दिवसात गंधाली या वातावरणात रमून जाईल अस तिला वाटल.गंधाली त्या छोट्या मैदानात गेली.तिथ तिच्या ओळखीचे कुणीही नव्हती.ती तिथंच एका दगडावर इतर मुलांची गंमत बघत बसली.बघता बघता अंधार व्हायला लागला.गंधाली जाण्यासाठी उठली.तिने चारही बाजूला पाहिले. उंच उंच इमारती आपल्याभोवती फेर धरून नाचताहेत....म्हणताहेत..' ये दरवाजा तोडगा...शिपाईदादा बोलेगा...! गंधालीच डोक गरगरा लागल.या इमारती आणखी जवळ येताहेत अस तिला वाटल.गावी मुलांची कड तोडून सुसाट धावणार्या गंधालीला वाटल या इमारतींच कड आपण तोडू शकणार नाही. हे कड आपल्याला कायमच्यासाठी जखडून ठेवणार आहे. जाण्यासाठी उठलेली गंधाली तिथेच दगडावर डोक गच्च घरून बसली! एका नव्या कड्यात कायमची बंद होऊन.----------*---------*----------*-------------*---------थोड्या वेळाने उठली व जड पावलांनी खोलीकडे जाण्यासाठी निघाली. एका फुलपाखराचे सप्तरंगी पंख कायमचे गळून पडले होते.--------------समाप्त--------
बाळकृष्ण सखाराम राणे
सावंतवाडी