Anubandh Bandhanache - 44 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 44

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 44

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ४४ )

सकाळी ताई प्रेमला खुप वेळ आवाज देऊन उठवत असते...
ताई : प्रेम...! अरे... उठ, किती वाजलेत बघ जरा, कामाला जायचं नाही का...?
* तिच्या वारंवार बोलण्याने प्रेम जागा होऊन भिंतीवरील घड्याळ पाहतो. साडे आठ वाजुन गेलेले असतात. कामाला जायची तर त्याची इच्छा पण नसते, त्यात उठायला खूपच उशीर झाला होता. मग तो पुन्हा अंगावर घेऊन झोपतो.
ताई पुन्हा त्याला आवाज देते...
ताई : अरे...! परत झोपला...! कामाला नाही जाणार का...?
प्रेम : नाही जाणार...!
ताई : का...? काय झालं...? तब्येत वगैरे ठिक आहे ना...?
प्रेम : काही नाही...! मी बरा आहे, मला झोपू दे जरा.
ताई : बरं झोप मग थोडा वेळ...! मी जरा दुकानात जाऊन येते.
*असं बोलुन ताई दरवाजा ओढून घेत बाहेर जाते.
प्रेमला काही झोप येत नव्हती, तो पुन्हा त्याच विचारात गुंग होऊन जातो. 
तो थोडा वेळ तसाच बेडवर पडून राहतो, मग त्याला काहीतरी आठवतं....
तो बेडवरून उठतो आणि कपाट उघडतो. कपड्यांच्या खाली लपवून ठेवलेला तो अल्बम बाहेर काढतो आणि तो घेऊन बेडवर बसतो. त्यातील एक एक फोटो पहात तो त्या सर्व गोष्टी आठवत असतो. सर्व फोटो पाहून झाल्यावर तो त्या अल्बम कडे पहात विचार करतो. जर ही गोष्ट आपल्याजवळ राहिली तर पुन्हा पुन्हा ते फोटो पाहण्याची इच्छा होणार. आणि किती दिवस ते असे लपवून ठेवणार. कधीतरी ते कोणाच्या तरी हाती लागणारच....! मग तेव्हा अजुन काही प्रॉब्लेम नको व्हायला...! मग याचं काय करायचं....! जाळून टाकू....? नको... ताई येईल आता, तिला समजायला नको. म्हणुन तो ते फोटो अल्बम पुन्हा कपाटात कपड्यांखाली लपवून ठेवतो. 
सर्व आवरून तो दुपारी जेवण करून ताईच्या नकळत ती फोटो अल्बम ची पिशवी घेऊन बाहेर पडतो. ती घेऊन तो आरव च्या घरी येतो. आरव घरी नव्हता. मग तिथून सायकल घेऊन तो नगराच्या बाहेर पडतो. तिथुन तो शहराच्या एका बाजूला असलेल्या त्या तलावाजवळ जातो. जिथे कधी कधी ते दोघे भेटत होते. खरं तर ते ठिकाण एक कपल स्पॉट होते. तिथे पोचल्यावर तो इकडे तिकडे नजर फिरवतो. ते दोघे ज्या ठिकाणी बसत होते तिथे आधीच एक कपल एकमेकांशी गप्पा मारत बसले होते. खुप वेळ प्रेम त्या दोघांना पहात असतो. त्यांना पाहून त्याला अंजलीची खुप आठवण येत होती. 
थोड्या वेळाने ते कपल तिथून निघुन जाते. ते पाहुन प्रेम त्या ठिकाणी जाऊन बसतो. आपल्या हातातील बॅग मधील तो फोटोंचा अल्बम बाहेर काढतो आणि शेवटचे एकदा ते फोटो पाहण्याचा मोह त्याला आवरता येत नाही. तो अल्बम उघडुन एक एक करून दोघांचे फोटो पहात तिच्या आठवणीं मधे रमुन जातो.
थोड्या वेळाने तो भानावर येतो...आपण इथे तिला आठवण्यासाठी आलेलो नाही तर तिच्या आठवणी दुर करण्यासाठी आलो आहोत, हे त्याच्या लक्षात येते. 
तो अल्बम बंद करतो, आता या फोटोंचे काय करायचे ते त्याला समजत नाही. कारण जाळुन टाकायचे म्हटल्यावर माचिस तरी हवी. 
शेवटी तो ते फोटो फाडून पाण्यामध्ये टाकायचे ठरवतो. तो अल्बम मधील सर्व फोटो बाहेर काढतो, एक एक करून तो ते फोटो फाडायला सुरवात करतो. त्या गोष्टीचा त्याला खुप त्रास होत होता, पण त्याच्याजवळ दुसरा काही पर्यायच नव्हता. या सर्वांमधून जर बाहेर पडायचे असेल तर हे करणे भाग होते. मनावर दगड ठेवून तो एक एक फोटो फाडत होता. 
काही वेळात तो ते सर्व फोटो फाडून त्याच बॅग मधे भरत असतो. त्या अल्बम सोबत त्याचा पासपोर्ट पण त्या बॅग मधे असतो. तो तरी ठेऊन काय करणार असा विचार करून तो पासपोर्ट पण फाडुन त्या फोटोंच्या फाटलेल्या तुकड्यांसोबत बॅग मधे भरतो. 
तिथुन ऊठुन तो तलावातील पाण्याजवळ जातो आणि ती बॅग पाण्यावरती उलटी पकडतो. एक एक करून त्या फोटोंचे सर्व तुकडे त्या पाण्यात पडून पसरायला लागतात. 
हातातील ती प्लास्टिकची बॅग आता रिकामी झालेली असते. त्यासोबत त्याचे मन ही थोडं हलकं झाले होते. यापुढे त्याला आता तिचे फोटो पाहता येणार नव्हते. त्या पाण्यात पडलेल्या फोटोंच्या तुकड्यांकडे पहात तो तिथेच खुप वेळ उभा असतो. 
हळु हळु ते सर्व तुकडे तलावातील पाण्यावर दूरवर पसरत जात होते. तसा तो अंजलीला आपल्यापासून दुर केल्याचा अनुभव घेत होता. 
थोड्या वेळाने तो पुन्हा येऊन त्याच ठिकाणी बसलेला असतो. त्याच्या मनात खुप विचार होते. 
'फोटो तर दुर केले पण, मनातुन, हृदयातून तिला कसं दुर करायचं...'?
असं बोलतात की, जस जशी वेळ निघुन जाईल तसे हळु हळू तेही होईल, 
 मी हे करतोय तिला विसरण्यासाठी.....! पण ती मला विसरू शकेल का...? 
समजा मी एखाद्या मुलीसोबत लग्न केलं... तर ते समजल्यावर ती माझ्याबद्दल काय विचार करेल...?
आधीच तिने एकदा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आहे, पुन्हा जर तिने असं काही पाऊल उचललं तर...?
काहीच कळेना काय करावं...!😔
नको त्या विचारांची गर्दी त्याच्या डोक्यात वाढत चालली होती. पण आता लग्न करण्याशिवाय यातुन बाहेर पडण्यासाठी दुसरा कोणता मार्गही नव्हता. 
पण... माझ्यासोबत लग्न करण्यासाठी कोणती मुलगी तयार होईल...?
असं काय आहे माझ्याजवळ, जेणेकरून कोणी लग्नासाठी होकार देईल....!
या विचारात तो असतानाच त्याच्या मोबाईलची रिंग होते. खिशातून मोबाईल काढुन तो बघतो तर ऑफिस च्या नंबर वरून कॉल येत होता... 
आज त्याने ऑफिस मधे येणार नाही हे कळवले नव्हते. काहीतरी काम असेल म्हणुन त्याने तो कॉल रिसिव्ह केला... 
समोरून आवाज आला...
" हाय प्रेम...! मी वैष्णवी बोलतेय... तु आज सुट्टीवर आहेस का...? काल काही बोलला नाहीस...? उद्या येणार नाही ते...? तब्येत वगैरे ठिक आहे ना...?
( वैष्णवी.... गेल्या काही महिन्यांपासून ती त्याच्या कंपनी मधे अकाऊंट चे काम करत होती. त्या काही दिवसात दोघांची चांगली फ्रेंडशिप झालेली होती. )
प्रेम थोडा वेळ शांतच होता... काय बोलावं ते त्याला सुचत नव्हतं... तिकडून पुन्हा वैष्णवी बोलू लागली.
" अरे बोल काहीतरी...? मी काय विचारतेय...?
तिच्या अशा प्रश्नांना काय उत्तर द्यायचे हे त्याला कळत नव्हते. खुप वेळ तो काहीच बोलत नव्हता....
वैष्णवी : अरे मग असा गप्प का झाला आहेस...? काही झालयं का...? सॉरी... मी चुकीच्या वेळी तर फोन नाही केला ना...?
अखेरीस तो बोलतो....
प्रेम : अरे...! असं काही नाही, जरा बरं वाटत नव्हतं म्हणुन नाही आलो आज ऑफिस ला...!
वैष्णवी : काय झालं...? ताप वगैरे येतोय का...? डॉक्टर कडे जाऊन आला की नाही मग...?
प्रेम : एवढं काही नाही...! गोळी वैगेरे घेईल मी मेडिकल मधुन...
वैष्णवी : अरे...! असं अंगावर काढू नको. डॉक्टर कडे जाऊन ये आत्ताच. पुन्हा जास्त झालं तर काय करणार....? अजुन सुट्ट्या घ्यायला लागतील तुला उगाच... एकतर तु नाहीस ऑफिसमधे तर सकाळपासून बोअर झाली आहे मी...! 
ते काही नाही... आत्ताच जा डॉक्टर कडे इंजेक्शन, गोळ्या, जे काही असेल ते घे... लवकर बरा हो आणि उद्या लगेच ऑफिसला ये...🙂
 * तिच्या अशा बोलण्याने एवढा वेळ टेन्शन मधे असलेला प्रेम नकळत किंचितसा हसायला लागतो. आणि तिच्याशी बोलू लागतो.
प्रेम : हो हो....! जाईन मी डॉक्टर कडे, आणि उद्या नक्की येईन ऑफिसला....!
वैष्णवी : पक्का... प्रॉमिस...?
प्रेम : हो...! 
वैष्णवी : गुड... वेल कम सुन...👍🏻
 * तिचा कॉल कट झाल्यावर तो पुन्हा त्याच विचारात गुंग होऊन जातो. लवकरात लवकर लग्नासाठी मुलगी शोधायला हवी....
एक अशी मुलगी जी गरीब घरातील असली तरी चालेल पण तिने माझ्या आईला स्वतःच्या आईसारखं सांभाळलं पाहिजे, माझ्या छोट्या भावाला आपल्या भावासारखे प्रेम दिले पाहिजे. 
खरच अशी मुलगी भेटेल....? आणि भेटलीच तर ती माझ्या या परिस्थितीत माझ्यासोबत संसार करायला तयार होईल....? 
या बाबतीत आजपर्यंत अंजली सोडुन मी दुसऱ्या कोणत्या मुलीचा विचार सुद्धा केला नाही. पण आता करायला हवा.... कारण अंजली आता माझ्या आयुष्यात कधीच येऊ शकणार नाही. हेही तितकच खरं होतं.... मग कोण...?
" वैष्णवी "..... नाही....! तिच्याबद्दल मी असा विचार कसा करू शकतो....? 
ती एक चांगली मुलगी आहे, पण मैत्रीण म्हणून...
आजपर्यंत कधी तिच्याकडे पाहून असं वाटलं नव्हतं की तिच्याबाबत आपण असा विचार करावा, पण आज वाटलं....! 
हो...! कारण आतापर्यंत माझ्या आयुष्यात अंजली होती. आणि आता ती नाही आहे. मग काय हरकत आहे. एकदा तिला विचारून तरी बघु.....
नको.... ती मला एक चांगला मित्र समजते, आणि कदाचित तिला अंजली बद्दल थोडीशी तरी कल्पना असावी, कारण खुप वेळा तिने मला कॉल वर बोलताना पाहिलं आहे. 
एवढ्या दिवसात जेवढं मी तिला ओळखतो, त्यावरून तरी असच वाटतं की, तिला प्रेम वगैरे या गोष्टीत काही इंटरेस्ट नसावा. 
पण मला तर लग्न करायचं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट ती माझ्या कास्ट मधील आहे, मग आईचाही याला विरोध नसणार, मग ठरलं तर, डायरेक्ट लग्नासाठी तिला विचारायचं....?
सध्या तरी दुसरा कोणता मार्गही नव्हता. मग एकदा हा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. तसंही आजपर्यंत आम्ही खुप बोललोय, एकमेकांच्या परिवाराबद्दल दोघांनाही माहित आहे. आणि तिला माझ्या सध्याच्या परिस्थितीची पुर्णपणे जाणीव आहे. 
एक चान्स तर घेऊन बघु.... जास्तीत जास्त काय होईल, एक तर होकार देईल किंवा नकार देईल... दुसरं काय....!
पण असं घाईघाईत तिला विचारणं योग्य नाही. थोडा वेळ घेऊ, तिला पण या गोष्टीची जाणीव व्हायला हवी की, मला ती बायको म्हणून हवी आहे. मग त्यासाठी थोडा वेळ तर द्यायला हवा.
ठरलं तर मग... उद्यापासून मिशन वैष्णवी....!
 * एवढ्या निराशेतून त्याला एक आशेचा किरण दिसत असतो. त्या एका चांगल्या विचाराने तो तिथून घरी यायला निघतो. 
घरी जाताना त्याची नजर पुन्हा एकदा त्या तलावातील पाण्यावर तरंगत असलेल्या फोटोंच्या तुकड्यांकडे जाते. मनात इच्छा होते की, एकदा शेवटचं तरी तिला त्या फोटोंच्या फाटलेल्या तुकड्यांमधे तरी पाहता येईल या आशेने त्याचे पाय त्या पाण्याकडे जायला वळतात. 
थोडं पुढे गेल्यावर तो जागीच थांबतो. त्याच मन त्याला पुढे जाऊन देत नव्हते.... 
' एकदा ठरवलं आहेस तर पुन्हा त्या मार्गावर का निघाला आहेस...? आता तुझा मार्ग वेगळा आहे, जे काही आजपर्यंत झालं, तो भुतकाळ होता, आता त्यामध्ये स्वतःला अडकुन घ्यायचं नाही. आता फक्त येणाऱ्या भविष्याचा विचार कर....'
शेवटी तो मनाचच ऐकतो आणि मागे येऊन घरी जायच्या दिशेने निघतो. पुन्हा मागे वळून पाहायचं नाही असं ठरवून.....!
दुपारी घरी येतो. आज त्याला थोडं रिलॅक्स वाटत होते. थोडा वेळ टीव्ही वर एक हिंदी पिक्चर बघत बसतो.
आज खुप दिवसांनी संध्याकाळी मैदानात मित्रांसोबत खेळायला जातो. अंधार पडेपर्यंत क्रिकेट खेळून तो घरी येतो. 
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तो सायकल घेऊन ऑफिसला जायला निघतो. कंपनीपासून थोड्या अंतरावर त्याला वैष्णवी चालत जाताना दिसते. तो तिच्याजवळ पोचतो आणि सायकल वरुन उतरतो. त्याला पाहून वैष्णवी बोलते...
वैष्णवी : अरे... आलास तू...? कशी आहे तब्येत तुझी...? बरं वाटतंय ना...?
प्रेम : हो...! 😊
वैष्णवी : बरं झालं आलास ते...! खुप बोअर होतं ऑफिसमधे तु नसला की...!
प्रेम : अच्छा...! 😊
वैष्णवी : हो...ना...! काल तर दिवस जाता जात नव्हता. खुप कंटाळा आला होता...!
प्रेम : बरं....! आज मी आलोय ना...! मग आज तु बोअर होणार नाहीस हे नक्की...!😊
 * बोलत बोलत ते दोघे कंपनीत पोचतात. प्रेम बाहेर सायकल लाऊन आत येतो. वैष्णवी ऑफिसमधील देवाचा दिवा लावत असते. प्रेमने तिला या आधीही खुप वेळा ते करताना पाहिले होते, पण आज तो एका वेगळ्या नजरेने तिच्याकडे पहात होता. 
ती दिवा लाऊन, अगरबत्ती ओवाळून मागे फिरते, प्रेम तिथेच तिच्याकडे बघत उभा असतो. त्याला असं पाहून ती बोलते...
वैष्णवी : हॅलो...! काय झालं...! असं का बघतोय...?
प्रेम : काही नाही...! एवढी मनोभावे रोज पुजा करतेस, नक्कीच चांगला नवरा मिळणार तुला...!
वैष्णवी : गप्प बस आता...! चला कामाला लागा, काल सुट्टी घेतली ना, खुप कामं पेंडींग आहेत.
 * तिच्या बोलण्यावर थोडंसं हसुन प्रेम त्याच्या कामाला लागतो. तो आता वैष्णवी सोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो.
दुपारचा लंच पण तो तिच्यासोबत करू लागला होता. त्यानिमित्ताने तिच्याशी जास्त वेळ बोलता येईल. ऑफिसला जाताना आता दररोज तो वेळेआधीच जाऊन त्या बस स्टॉप वर तिची वाट पहात थांबत होता. ती आल्यावर मग दोघे बोलत बोलत कंपनीत जात होते. 
संध्याकाळी ऑफिस मधुन सुटल्यावर पण ते दोघे सोबतच निघत होते. तिला तिची बस मिळेपर्यंत तो तिथेच थांबत होता. ती बसमधून निघुन गेल्यावर मग तो घरी निघुन जात असे.
हे आता रोजचेच झाले होते. ते दोघे मित्र तर होतेच पण आता हळू हळू त्यांना एकमेकांची सवय व्हायला लागली होती. काही दिवस हे असेच चालु होते. प्रेम तर ठरवून सर्व करत होता, पण वैष्णवी त्याच्यात गुंतत चालली होती. याचा त्याला थोडासा अंदाज येत होता. तरीही काही दिवस तो संयम ठेऊन होता.
अखेर प्रेम त्या क्षणाची वाट पहात होता तो दिवस त्याने स्वतःच ठरवला होता, कारण त्याच्याकडे वेळ नव्हता. म्हणुन एक दिवस ऑफिस मधुन सुटल्यावर तो वैष्णवीला बोलतो.
प्रेम : वैष्णवी...! तुझ्याकडे वेळ आहे का थोडा आज...?
वैष्णवी : का...? काय झालं...?
प्रेम : मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. जर तुला वेळ असेल तर...?
वैष्णवी : अरे...! असं काय बोलायचं आहे...? काही घरचं टेन्शन वैगेरे आहे का...?
प्रेम : तसं काही नाही...! मला जरा वेगळं काहीतरी बोलायचं आहे. 
वैष्णवी : वेगळं...? म्हणजे काय नक्की. ?
प्रेम : ते सर्व मी इथे नाही बोलू शकत, पुढे एक तलाव आहे तिथे गार्डन आहे, आपण तिथे जाऊन बोलुया. मी तुझा जास्त वेळ घेणार नाही.
वैष्णवी : तु एवढं बोलतोय तर ठिक आहे, पण जास्त वेळ मी थांबणार नाही. घरी जायला उशीर होईल मग, आई वाट बघत असते घरी...!
प्रेम : हो...! माहित आहे मला. आता यातच वेळ जातोय. चल लवकर...
 * ते दोघे ऑटो करून त्या तलावाजवळ असलेल्या गार्डन मधे येतात. त्या तलावाच्या कट्ट्यावर काही अंतरा -अंतरा वर कपल्स बसलेले होते. ते पाहून वैष्णवी थोडी गोंधळुन जाते. ती प्रेमला बोलते.
वैष्णवी : आपण इथे का आलोय...? इथे तर हे सर्व...?
प्रेम : तु ते जरा इग्नोर कर...! आणि इथे बस...!
 * तो तिला एका ठिकाणी बसायला सांगतो. ती थोडी अवघडलेल्या अवस्थेत तिथे बसते. प्रेमही तिच्या बाजुला बसतो. वैष्णवीला तिथे थोडं अन् कंफर्ट वाटत होतं. ती प्रेमला बोलते...
वैष्णवी : बोल आता पटकन...! काय बोलायचं होतं तुला, एकतर मला आता भीती वाटू लागली आहे, चुकून ओळखीच्या कोणीतरी मला इथे पाहिलं तर...?
प्रेम : अरे...! किती टेन्शन घेते, कोण येणार आहे तुला इथे बघायला. रिलॅक्स...!
वैष्णवी : तुला नाही कळणार, ते जाऊदे तु बोल, तुला काय बोलायचं होतं...! ज्यासाठी तु मला इथे घेऊन आला आहेस.
प्रेम : हो... हो...! बोलतो, जरा धीर घे. 😊
वैष्णवी : अरे मग अजुन उशीर होईल, घरी जायला.
 * तिच्या अशा बोलण्याने प्रेमला तिचा थोडा राग येतो. तो ऊठुन उभा राहतो आणि त्या रागाच्या भरात तिला बोलतो.
प्रेम : बरं मग राहु दे बोलायचं...! आपण निघुया, तुला उशीर होत असेल तर....!
 * त्याला असं रागात पाहून ती त्याच्या हाताला धरून खाली बसवत बोलते....
वैष्णवी : अरे...! लगेच राग येतो तुला...! बरं सॉरी..! आता तरी बोलशील का...?
 " प्रेमला हि संधी घालवायची नव्हती, म्हणुन तो काही क्षणाचा राग विसरून तिच्याकडे फिरून बसतो आणि तिच्याशी बोलू लागतो.
प्रेम : वैष्णवी...! मी आत्ता जे काही बोलणार आहे ते सर्व गेले काही दिवस माझ्या डोक्यात साचुन होतं, आणि कधीतरी मला ते बाहेर काढायचं होतं. म्हणुन मी आज तुला इथे घेऊन आलो आहे.
वैष्णवी : असं काय बोलायचं आहे तुला...? 🤨
प्रेम : आधी ऐकुन तर घेशील, मला काय बोलायचं आहे ते...?
वैष्णवी : बरं बोल...!
प्रेम : एवढे दिवस आपण मित्र म्हणुन एकत्र आहोत, आणि मला वाटतं की, माझ्याबद्दल किंवा माझ्या परीवाराबद्दल तुला काही माहित नाही, अशी कोणतीच गोष्ट नाही. एवढ्या दिवसात मी सर्व काही तुझ्याशी शेअर केले आहे.
वैष्णवी : हो...! मग....?🤨
प्रेम : वैष्णवी...! मला लग्न करायचं आहे...! आणि ते ही तुझ्याशी....! 
वैष्णवी : प्रेम...! काय बोलतोय तु...?🤔
प्रेम : जे माझ्या मनात कित्येक दिवस चालु आहे तेच बोलतोय मी...! मला नाही माहित, तु माझ्याबद्दल काय विचार करतेस, पण मी जे बोलतोय ते आधी पूर्ण ऐकुन घे, मग तुला हवं ते तु बोल.
हे बघ...! आज ना उद्या आयुष्यात हि गोष्ट घडणारच आहे. आणि आत्ता मला हि संधी घालवायची नव्हती.
कारण, तुझ्या एवढं मला दुसरं कोणी ओळखत नाही. माझ्या बद्दल तुला सर्वच माहित आहे. 
तरीही पुन्हा सांगतो..... मी आत्ता सध्या माझ्या ताईकडे राहतोय. 
इथे माझे अजुन तरी स्वतःचे घर नाही, काही दिवस आपल्याला भाड्याच्या घरात रहावं लागेल. आणि तेव्हा माझ्यासोबत माझी आई आणि माझा लहान भाऊ पण असेल. ते दोघेही गावी राहिलेले आहेत. त्यांना आणि मला सांभाळून घेणारी अशी मुलगी जर कोण असेल तर ती फक्त तु आहेस. कारण मी तुला एवढे दिवस झाले ओळखतोय. आणि या बाबतीत मी चुकीचा असू शकत नाही. मी किती कमवतोय ते तर तुला माहीतच आहे. कारण पगार तुच काढते. त्यामधे मला सर्व खर्च भागवावा लागणार आहे. एवढ्या पगारात मी तुला खुप काही देऊ शकणार नाही, हे मला माहीत आहे. पण तरीही मी लग्नाची बायको म्हणून फक्त तुझाच विचार करतो. कारण माझ्या आईला आईचं प्रेम देणारी आणि माझ्या लहान भावाला आपला भाऊ समजून जर कोणी सांभाळ करेल तर ती फक्त तु आहेस...! 
सॉरी...! खुप बोललो...! पण मन हलकं झालं, तु बोल आता, तुला जे काही बोलायचं असेल ते...!
 * त्याच्या या अशा बोलण्याने वैष्णवी पुर्णपणे गोंधळुन गेली होती, तिला मघाशी थोडीफार कल्पना आली होती, पण प्रेम डायरेक्ट लग्नासाठी विचारेल असं तिला वाटलं नव्हतं. ती फक्त त्याचं बोलणं ऐकुन घेत होती. आणि आता तिलाही पुढे काय बोलावं ते सुचत नव्हते. काही वेळ ती फक्त शांत बसून होती. प्रेम तिच्या बोलण्याची वाट पहात होता. थोडा वेळ विचार करून ती त्याच्याशी बोलायला लागते....
वैष्णवी : प्रेम...! तु आत्ता जे काही बोललास ते मी शांतपणे ऐकुन घेतलं. आता तु ही थोडं माझं ऐक...
मी हे बोलत नाही की, तु चुकीचं काही बोलला आहेस. तुझ्या मनातलं सर्व तु बोलुन गेलास. पण मला काय वाटेल याचा विचार तु केला नाहीस.
आज तु डायरेक्ट लग्नासाठी मला विचारलं. तेव्हा मीही थोडी गोंधळुन गेली होती. कारण तुला कदाचित माझ्या बाबतीत काही गोष्टी माहीत नाहीत. 
आज जर तु हा विषय काढला आहेसच तर सांगते मी, माझं एक लग्न मोडले आहे. तेव्हापासुन मी लग्न या गोष्टीपासून खुप लांब आहे. आणि मला खरच मला इच्छा नाही आता लग्न वगैरे करायची. त्यामुळे तु माझ्याबद्दल जो विचार करत आहेस, तो आधी डोक्यातून काढून टाक. कारण ते शक्य नाही. 
आणि प्लिज...! आपलं नातं हे मैत्रीपर्यंतच राहु दे. पुढे काही होणार नाही. हे तु नीट समजुन घे.
मला आता यावर जास्त काही बोलायचं नाही. मी आता निघते, मला उशीर होतोय...
 * असं बोलुन ती तिथून एकटीच निघुन गार्डन मधुन बाहेर पडते. प्रेम तिच्या मागोमाग तिला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण ती काही थांबत नाही, तिथून बाहेर आल्यावर लगेच एका ऑटोमधून ती घरी निघुन जाते.
प्रेम त्या ऑटोकडे फक्त पहात रहातो. तिच्या या अशाप्रकारे निघुन जाण्याने तो खुपच निराष होतो.
आता काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. थोडा वेळ तो तिथेच बाजुला असलेल्या बस स्टॉप वर येऊन बसतो. 
खुप वेळ तो तिथेच बसलेला होता. आता यावर जास्त विचार करून काही होणार नव्हते. या गोष्टीचा त्याला अंदाज आला होता. कारण जर वैष्णवीच्या मनात थोडं जरी त्याच्याबद्दल प्रेम असते तर, ती अशीच पुढे काही न बोलता निघुन गेली नसती. 
आता हा विषय इथेच संपवायला हवा. असा विचार करून तो तिथून घरी निघुन येतो.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️