आंबा पहिल्यापासून अतिशय आवडत फळ 😋
फळांचा राजाच तो ..😍
त्यात घरी वडिलांना आंब्याची अतिशय आवड
अगदी बाजारात आंबा आल्यापासून ते आंबा मिळणे बंद होईपर्यंत घरी आमरस असायचा 😃
मात्र त्यावेळी जास्त करून पायरी आंबा मिळायचा
हापुस खिशाला परवडत नसे...
माझ्या आजोळी सुध्दा शेतात आंब्याची दोन झाडे होती
मे महिन्यात तिकडे दोन खोल्या भरून आंब्याची आढी घातलेली असे
आढी घातली की आमंत्रण येई ..
लगेच आम्ही सर्व भावंडे तेव्हा तेथेच सुट्टी साठी जात असू .
आणि मनसोक्त आंबे खात असू 😋
यानंतर यथावकाश लग्न झाले
काही वर्षानी जेव्हा घर बांधायचे ठरवले तेव्हा मोठी जागा बागेसाठी असेल
अशाच ठिकाणी घर बांधले
चिक्कू ..पेरू ..अंजीर.. केळी .. नारळ यासोबत
"रत्नागिरी हापूस" ची दोन कलमी झाडे आणून लावली
तीन वर्षात फळे धरतील अशी ती उत्तम प्रतीची कलमे होती
योग्य देखरेख ,आवश्यक तितके पाणी, थोडे गोमूत्र फवारणी
आणि काही मात्रेत लेंडी खत घालत राहिलो
खरोखरच तीन वर्षानंतर दोन्ही झाडे फळांनी अक्षरशः लगडून गेली पहिल्याच वर्षी इतक पीक पाहून आम्ही तर चकीतच ,.. 🙂
हळूहळू कैरीचा साईज मोठा होऊ लागला
मग या कैऱ्या काढून त्याचे वेगवेगळे पदार्थ
जसे की कायरस . गुळांबा ,कढी ,लोणचे , मेथांबा,वेगवेगळ्या चटण्या ,
चित्रान्न ,कैरीची डाळ ,पन्हे वगैरे करणे सुरू झाले 😊
मग शेजारी पाजारी मैत्रिणी यांना नमुना म्हणून कैरी वाटप ..😊.
खूप खूप उत्साह वाटत होता ❤️
नंतर मात्र कैरीने बाळसे धरले आणि तिची प्रगती आंबा होण्याकडे होऊ लागली 🙂
दोन्ही झाडे वेगवेगळी असून फळ मात्र दोघांचेही चांगलेच "बाळसेदार" होते
आणि मग एके दिवशी वेळ वखत बघून हे आंबे काढून
आढीत घातले गेले
यथावकाश आठ दिवसातच आंब्याचा घमघमाट सुटला 😋
आणि त्यांनी पिकल्याची वर्दी दिली .
मग काय नुसता आनंदी आनंद
लगेच सगळे आंबे लॉफ्ट वरुन उतरवून पेटीमध्ये गवताच्या कुशीत रीतसर भरले गेले
थोडे कच्चे पक्के वर खाली बघून त्याची मांडणी झाली
आणि मग पहिले पांच आंबे देवापुढे ठेऊन
प्रथम आम्ही कापून खाल्ले
नंतर मात्र नातेवाईक ,शेजारी ,मित्र मैत्रिणी ,इकडचे
तिकडचे ओळखीचे या सगळ्यांना वानवळा म्हणून पाच पाच आंबे वाटप झाले 😊😊
त्यानंतर रोज आमरस ,आंबा आईस्क्रीम ,आंब्याचे सासव ,
आंबा कुल्फी ,मॅंगो शॉट . आंबा लस्सी ,मॅंगो शेक मॅंगो शिरा , आंब्याची पोळी, करंजी, पुरी, शंकरपाळी, आंबा भात., आंब्यांचे आप्पे, आंबा केक, बारबेक्यू.., मँगो ब्लास्ट... अनेक चवीष्ट प्रकार.. 😋😋
थोडक्यात ज्यात त्यात आंबा 😀
शिवाय आमरस तर रोजच..
सोबत पुरी ,पोळी,फुलके ,मोदक ,पातोळे धीरडी ,
उकडीच्या पोळ्या अशी पदार्थांची रेलचेल सुरू झाली 😋😋
त्या त्या वेळेस हजार असणाऱ्या पाहुण्याना त्याचा आस्वाद
घ्यायला मिळू लागला . 😊
चांगले महिनाभर हे सारे आंबे पुंरले
शेवटच्या टप्प्यातील आंब्याचा साखरांबा केला गेला
यांची कृती म्हणजे
आंब्याची साले काढून त्याच्या मध्यम जाडीच्या फोडी
करून वाफवून घेणे
जेणे करून त्यातील पाण्याचा अंश निघून जाईल
साखरेचा दोन तारी पाक करून त्यात या फोडी टाकून थोडा वेळ शिजवून घेणे
थोडा घट्टसर झाला की बाटलीत भरून ठेवणे
याचा स्वाद फार मस्त असतो
आंबा सीझन संपला तरीही कधीही हा काढून खाता येतो
अशी ही पहिल्या वर्षीची आंबा कहाणी
गेली तीस वर्षे ही दोन्ही झाडे आम्हाला अविरत
फळे देत आहेत . सुंदर रंग ,मोठा आकार ,पातळ साल ,
मधुर चव अशी फळे देणाऱ्या झाडांचे आमच्यावर उपकार आहेत .🙏
गेली पाच वर्षे यातील एक दोन पेट्या आंबा घेऊन नातीकडे (नारायणी)जायला लागते 😍 कारण ती सुध्दा पिढीजात आंबा प्रेमी आहे 😀
दर वर्षी दहा ते पंधरा पेट्या आंबा निघतोच निघतो 🙂
खाणारा प्रत्येक जण प्रशंसा करतो
दर वर्षी यांची वाट पाहतो
कोरोना काळातही दोन वर्षे असेच भरपूर पीक आले .
तेव्हा कोणी कोणाकडे येत जात नव्हते
आम्हालाही पुण्यात जाता आले नाही तिकडून कोण येऊ शकले नाही
त्यामुळे आम्ही खाऊन ही शिल्लक ऊरतील अशा सात आठ पेट्या आंबा अंधशाला वृद्धाश्रम अनाथआश्रम अशा ठिकाणी
देऊन आलो
त्या वर्षी आमच्या आंब्यांमध्ये त्या सर्वांचा शेअर होता .
त्यांना आणि आम्हाला सर्वानाच बरे वाटले इतके चांगले फळ वाया न जाता सत्कारणी लागले होते .
वर्षभर झाडांचा निगुतीने सांभाळ करून
वेळोवेळी त्याची छाटणी करून घेणे ,पाणी ,शेणखत दरवर्षी नियमित घालून त्याची निगा ठेवली जाते
गोमूत्र सुद्धा वेळोवेळी दिले जाते जेणेकरून फळात गर भरताना कीड राहत नाही
हे सर्व काम आमचे “अहो” फारच प्रेमाने करतात 💕
ही झाडे आमच्या कुटुंबाचे सदस्यच आहेत
आंबे आढीत घालणे हा दिवस जणू एक समारंभाचा दिवस असतो आमच्याकडे... 🙂
त्याची आमच्या डॉक्टर अहोनी सेट केलेली सिस्टीम अशी आहे...
ज्या वेळी असे लक्षात येते की आंबा देठाकडे थोडा पिवळसर दिसू लागला आहे व एखादी कैरी कापून पाहिली असता आतील गर पिवळसर दिसू लागला की त्यावेळी
आंबे काढणाऱ्या माणसांना बोलावून झाड दाखवले जाते
म्हणजे ते लोक झाड बघून किती आंबे आहेत.. कसे काढायचे वगैरे ठरवतात
त्या ठराविक दिवशी
सकाळी लवकरच आंघोळ नाश्ता करून
स्वयंपाक करून तयार राहायचे
तीन जण येतात दोन झाडावर दोन आणि खाली एक
देखरेख ठेवायला “अहो” आणि बारीक सारिक कामाला
“बारक्या “च्या भूमिकेत मी 😃
वरच्या माणसाकडे पिशवी, कटर ,आंबे काढायची जाळी सोपवली जाते .
आंबा व्यवस्थित देठ ठेवून काढायचा ,खाली पाडायचा नाही
अशी “अहो “ची सक्त ताकीद असते 😀
हळूहळू दोन्हीकडचा आंबा खाली येऊ लागतो
आंबे खाली येताच त्याची पिकलेले ...
कमी पिकलेले....
लहान ...
मोठे ....
काढताना चुकून पडलेले....
अशी प्रतवारी “अहो “करतात
हे सर्व आंबे बागेत लॉन वर ठेवलेले असतात
त्याचे देठ अर्धा इंच ठेवून कट केले जातात
हे सर्व व्हायला तीन चार तास तरी लागतातच ..
हे काम झाले की कामगार नाश्ता चहा घेऊन पाच सहा आंबे सोबत घेऊन आपली ठरलेली बिदागी घेऊन निघून जातात
आंबे काढून झाले की हे सर्व आंबे चार ते पाच तास चीक मुरण्यासाठी ठेवले जातात ..
त्यानंतर हे सर्व आंबे कोमट पाण्यात वीस मिनिटे ठेवले की आंबा स्वच्छ होतो
या अवधीत आम्ही आमचे जेवण आटोपून घेतो
मग साधारण दहा लीटर पाण्यात चार पाच थेंब इथेनोल घालायचे आणि त्यात हे आंबे परत दहा मिनिटे ठेवायचे
यामुळे यातील बारीक कीड ,कृमि असतील तर पूर्ण मरतात
हे आंबे पाण्यातून बाहेर काढून फडक्यावर सुकायला ठेवले जातात
सुकले की हे आंबे आता आढीत घालायला तयार होतात .
मगच लॉफ्ट वर सतरंजी अथवा बेडशीट घालून त्यावर वर्तमानपत्र पसरले जाते
आंबे ओळीने रचून ठेवून वर छान गरम पांघरूण घातले जाते
या सर्व कामात निगुती आणि टापटीप शिवाय व्यवस्थितपणा जो लागतो तो “अहो” कडे आहे .
या सगळ्या प्रोसेसमधील प्रत्येक काम सिस्टिमनेच झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो...
म्हणूनच इतकी रसाळ गोमटी फळे मिळतात
आणि याचे श्रेय पूर्णपणे त्यांचे आणि कृपा ईश्वराची आहे 🙏
अशी ही घरच्या आंब्यांची रसाळ कहाणी