Ramoji's Farm in Hindi Horror Stories by Bharat books and stories PDF | रामोजी का खेत

The Author
Featured Books
Categories
Share

रामोजी का खेत






सकाळचे सहा वाजले होते......
गणेश अजूनही गाढ झोपेत होता. तेवढ्यात त्याला अंगाला काहीतरी टोचल्यासारखे जाणवले.
त्याने त्याकडे दुर्लक्ष करून स्वप्नात रंगणे सुरूच ठेवले.

"आईSSS!" एक जोरदार धपाटा त्याच्या पाठीवर पडला.....
आणि तो चाचपडत उठला. त्याची आई सकाळची कामं आटपून त्याला शाळेसाठी उठवत होती. तो जरा नाराजीनेच उठला आणि आंघोळीला गेला, पण आज तो बऱ्याच दिवसांनी शाळेत जाणार असल्याने खूप आनंदात होता, कारण दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा मित्रमंडळी जमणार होती आणि नवीन उपक्रमांवर चर्चा होणार होती.

राजेश, मोहन आणि गणेश हे बालपणीचे जिवलग मित्र होते. तिघेही यावर्षी आठवीत होते. राजेश हुशार होता, पण तसा भित्रा होता. त्याचा खंडोबा देवावर खूप विश्वास होता. मोहन हा टवाळखोर होता, घरातील एकुलता एक असल्यामुळे लाडाकोडात वाढलेला आणि धीटही होता. गणेश हा साधाभोळा होता; कोणतीही गोष्ट त्याला वेळ गेल्यावर समजत असे, पण राजेशपेक्षा कमी घाबरट होता.

आपली न्याहारी करून तो शाळेकडे निघाला.
समोरून पाडंबा म्हशीचा चारा घेऊन येत होता.
गणेशला पाहताच तो म्हणाला,
"का गणोजीराजे, अजून झोप गेली नाय तुमची वाटतं?" 
गणेश गप्पपणे डोळे चोळत शाळेकडे चालू लागला. शाळेत आल्यावर तिघांची मैफील जमली. दिवसभर दिवाळी आणि गृहपाठ यांच्यावर चर्चा झाली.
संध्याकाळी शाळा सुटल्यावर तिघेही सोबत घरी जात असताना मोहन म्हणाला, "काय गनोजी राव, उद्या जायचं का रामोजीच्या बागेत? खूप बोरं पिकली आहेत आणि चिंचा पण आहेत तिथे."
राजेश मध्येच बोलला, "नाही रे, तिकडे भूत आहे म्हणतात गावातील लोक. संध्याकाळी कोणी जात नाही तिकडे."
मोहन म्हणाला, "अरे धत्! येड्या, गावातील लोक असंच घाबरवतात, त्यांना दुसरं कामधंदाच नाही."
गणेश म्हणाला, "हो रे, माझा बाप म्हणत होता तिकडे चुकूनही संध्याकाळी जायचं नाही. काही वर्षांपूर्वी गावातील एका माणसाने तिथे चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतला होता. त्याचे कोणीही व्यवस्थित अंत्यसंस्कार न केल्याने त्याची आत्मा तिथेच भटकत असते. मागच्या हिवाळ्यात काही लोक बोरगावाहून येत होती, त्यातील एक जण त्या बागेमध्ये विसावा घेण्यासाठी थांबला. दुसऱ्या दिवशी त्याचे प्रेत त्या बागेत रामोजीला दिसले."
"अरे, पण तो रामोजी दिवसभर त्या पीराच्या ठाण्यावर थांबून असतो. तो कोणालाही तिकडे फिरकू देत नाही आणि त्याची बाग असल्यामुळे झाडाला हातसुद्धा लावू देत नाही. खूप रसरशीत, गोड, टपोरी बोरं आहेत तिथली! एकदा मी आणि माझा मोठा भाऊ गेलो होतो, खाल्ले की दोन दिवस तोंडातून पाणी जात नाही," असे मोहन म्हणाला.
चर्चेला विराम देत गणेश म्हणाला, "बघू उद्या. आज घरी वांग्याच्या भरताचा बेत आहे, त्यामुळे आज पोटभर जेवणार. चला पटपट."
मध्येच राजेश म्हणाला, "आमचे तर वांगी 'सट' चालू आहे, त्यामुळे मला तर बघूही नाही त्यांच्याकडे. तुझ्या बोलण्यातच समाधान मानावं लागेल मला."
एकच हशा पिकला.
दुसऱ्या दिवशी तिघेही शाळा सुटल्यावर भेटले. मोहन म्हणाला, "चलायचं नव्हं?"
राजेशच्या मनात भीती होती, पण दाखवायची नाही असे ठरवून तो म्हणाला, "त्यापेक्षा बाजारात जाऊन घेऊन येणार आहे. माझे अण्णा कालच बोलले मला."
गणेश विचारात पडला होता की जायचं की नाही. या विचारात त्याने होकार दिला. पण मोहन काही तयार होईना. तो म्हणाला, "लवकर जर परतणार असाल तरच येतो, तसंच अण्णा रागावतील का गेला होता तिकडे."
मोहन त्याची समजूत काढत म्हणाला, "हो खंडोबा शप्पथ, लवकर येऊ." खरं तर मोहनला झाडावर चढता येत नव्हतं आणि राजेश हा तरबेज होता चढाईत.
तिघेही त्या दिशेने चालू लागले. तशी ती बाग लांब होती, पण त्या रस्त्याला लागूनच ते भूताचे झाड होतं आणि समोरच्या फाट्याला लागूनच पीराचे ठाण दोन कोसांवर होतं. ठाण तसं जुनं होतं, पण गावातील संकटाला कधीकाळी पीर बाबा धावून येत असे, अशी सांगता होती. पण जेव्हापासून तो माणूस मेला तिकडे, लोक कमी फिरकू लागले. सध्या तिथे कोणी जात नाही, मोजकी माणसं सोडली तर फक्त रामोजी जात असतो. त्याची तिथे शेतजमीन व बाग असल्याने तो दिवसभर तिकडे असतो. त्याचा पीरावर खूप विश्वास आहे, तो त्या ठाण्याची सेवा करतो आणि संध्याकाळी पाच वाजता घरी जातो.
तिघेही रामोजीची जाण्याची वाट बघू लागले. रामोजी गावाकडे जाताना पाहून ते त्या पीराच्या रस्त्याकडे चालू लागले. ते फाट्याजवळ पोहोचले. समोर ते झपाटलेले झाड होते, त्याच्याजवळून तिघे हळूहळू चालत पुढे बागेच्या दिशेकडे जाऊ लागले. पण गणेशला काहीतरी विचित्र असल्यासारखं जाणवू लागलं. कोणीतरी आपल्याला बघत आहे असं त्याला वाटत होतं. समोरच लांबून ठाण्यावरून पीराचा हिरवा झेंडा फडकत होता. हिवाळ्याचे दिवस असल्याने गार वारा सुटला होता. अजूनही थोडा उजेड होताच, पण हिवाळ्याचे दिवस असल्याने लवकर अंधार पडत असे.
राजेश सरसर झाडावर चढून बोरं तोडू लागला आणि खाली मोहन व गणेश हातात झेलून शाळेच्या बॅगेत बोरं भरत होते. बॅग थोडी भरल्यानंतर मोहन म्हणाला, "आता चिंचोके तेवढे राहिले घ्यायचे, त्यांची चटणी करायला सांगितली मी घरी." त्यानंतर राजेश पटापटा खाली उतरून चिंचेच्या झाडाला दगड मारू लागला. मोहन नेमबाजीमध्ये पटाईत होता, त्यांनीही नेम धरला जो एका पक्षाला लागला. तिथे काळोख असल्याने त्यांना तो पक्षी काही दिसला नाही. जोरात आवाज करत तो पक्षी त्यांच्याकडे झेपावला. तिघेही थोडे घाबरले, वटवाघूळ होतं ते. हे झाड खूप दाट असल्याने त्याच्यावर वटवाघूळ आणि घुबड राहत होते. तिकडे सूर्यदेव मावळू लागले होते, आता किंचित अंधुक प्रकाश पडत होता.
राजेश म्हणाला, "चला घरला आता, खूप झाली बोरं आणि चिंचोके पण."
अजूनही मोहन काही ऐकायला तयार नव्हता. "एवढी एक फांदी राहिली बस."
ती अमावस्येची रात्र होती, त्यामुळे आकाशात चंद्रदेव अंगावर शाल ओढून झोपले होते. फक्त चांदण्यांचा तेवढा आधार होता, तरीही कोणी डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही इतका अंधार होता. तिघेही रस्त्याने चालत होते. दुरून कोल्हेकुई ऐकू येत होती. आजूबाजूच्या झाडांवरून घुबडांचे आवाज ऐकू येत होते, तर दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आणि रडण्याचा आवाजही येत होता. तो आवाज मुलांच्या भीतीला भर घालत होता.
राजेशला अंधाराची फार भीती वाटत होती. त्याच्या मनात त्यांच्यासोबत येण्याचा विचार नव्हता, पण मोहनने बळजबरी त्याला सोबत घेतले. मग राजेशचा नाईलाज झाला. गणेश दोघांच्या मध्ये चालत होता आणि पुढे मोहन बेडरपणे त्यांच्या सगळ्यांच्या पुढे होता. राजेश सगळ्यांच्या मागे होता, त्याने पोटाशी बॅग धरली होती.
आता ते झाडाजवळ येत होते, तसतसा राजेशच्या पोटातील गोळा वाढू लागला, भीतीचा गोळा वाढू लागला. त्याचे पाय लटलट कापू लागले, त्याच्या सर्वांगाला घाम फुटला. "आज तर अमावस्येची रात्र, भूत बाहेर निघतात, यांचा बाजार भरतो," असं राजेशने त्याच्या आजीकडून ऐकलं होतं. भूताची भीती वाटू लागली की खंडोबाचे स्मरण करावे, त्यामुळे भूत जवळ येत नाही असे आजीने त्याला सांगितले होते. राजेश तोंडात नाव पुटपुटत होता, पण भीतीमुळे त्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला होता. कोणी कोणाशी बोलत नव्हते, तिघेही मुकाट्याने चालत होते.
अचानक गणेश धपकन खाली पडला. त्याचा पाय सरकला आणि तो दगडावर आपटला होता, त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता. रक्त घळाघळा वाहू लागले होते. त्याने एक हात डोक्यावर ठेवून खाली बसूनच दोघांना आरोळी दिली. तसे दोघे थांबून त्याला त्यांनी उचलले आणि त्याचा हात आपल्या गळ्यात घेऊन मोहन चालू लागला.
"उद्यापासून मी तुमच्यासोबत येणार नाही, एकटाच निघेल घरी," असं राजेश म्हणाला.
आता ते झाडाजवळ आले होते. त्या झाडावर दोन लखलखीत, लालबुंद डोळे सारखे चमकत होते. ते बघून राजेशला चांगलाच दरदरून घाम फुटला, पण मोहन न घाबरता त्या झाडाकडे बघत म्हणाला, "कोण आहे रे वर? खाली उतर."
अचानक भयानक शांतता पसरली. इतक्यात झाडावरून एक काळकुट्ट आकृती धाडकन त्यांच्यासमोर उभी ठाकली. चांगलं सहा फूट उंच, लालभडक डोळे, मळकट कपडे आणि फाटलेले धोतर असलेली ती व्यक्ती होती. तिचं वय चाळीस इतकं असावं. मानेला कशाचे तरी व्रण पडलेले होते. हे दृश्य पाहून तिघांची दातखिळी बसली. मोहन ही थोडा घाबरलेला होता, पण हिंमत करून त्याने विचारले, "कोण तू? आणि इतक्या रात्री झाडावर बसून काय करत होतास?"
तो म्हणाला, "मी महादू. मला खूप भूक लागली आहे, तुमचीच वाट बघत होतो."
गणेशला सगळं समजलं. हा दुसरा तिसरा कोणी नसून भूतच आहे. देव जाणे संकटात त्याची बुद्धी कशी चालली. त्याने राजेशला इशारा करत सांगितले. तसा राजेश दोघांच्या मागे लपला. मोहनला कळून चुकले आता आपण मरणार, कारण समोर गावाकडे जाणारा रस्ता होता, पण समोरच ते भूत आणि इकडे पीराचे ठाण होते, पण त्याची हद्द अजून लांबच होती. तेवढ्यात घाबरून राजेश फाट्याकडे पळू लागला आणि त्याच्या मागोमाग मोहन आणि गणेशही. गणेशच्या अंगात त्राणच उरला नव्हता, कारण मघाशीच डोक्याला मार लागला होता, तरीही सारी शक्ती एकवटून तो पळत होता. ते भूत मागोमाग येत होतं. इतक्यात गणेश बेशुद्ध होऊन पडला. मोहनने त्याला बघितले, तो त्याच्याकडे धावला. ते भूत आता जोरजोरात हसू लागले, मध्येच विचित्र आवाजही येत होते.
इकडे राजेश पीराच्या हद्दीत आला होता. त्याने मागे वळून बघितले, त्याचे मित्र मागेच राहून गेले होते. ते भूत त्यांना मारून टाकेल या भीतीने तो घाबरतच दर्ग्यावर आला. तिथे एक फकीर बाबा धुनी करत बसले होते. त्याने त्यांची मदत मागितली. तो बाबा हसत म्हणाला, "चल माझ्याबरोबर."
इकडे मोहन त्या अमानवीय शक्तीला समोर बघून रडत होता आणि गणेशला त्याने मांडीवर घेतले होते. कितीही झाले तरी मित्राला असं सोडायचं नाही. 'अरे, संकटाला धावून आली तीच खरी मैत्री' आणि राजेशवर संतापतही होता. इतक्यात हवेच्या गतीने त्या भूताने दोघांवर प्रहार करणार तोच त्या बाबाने त्या भूतावर अंगारा फेकला. त्याने ते भूत धाडकन मागे ओढले गेले. त्याचे अंग त्या अंगाराने जळत होते आणि तो संतापत म्हणाला, "तुझी हद्द नाही, जा तिकडे. मध्ये पडू नकोस. तसंच ह्या लोकांनी पाठ फिरवली तुझ्याकडे, का त्यांच्या मदतीला येतोय?"
तो फकीर म्हणाला, "कितीही झाले तरी आई-बाप पोरांकडे दुर्लक्ष करत नाहीत. आणि तुझा प्रताप वाढतच चाललाय, चल निघ इथून, नाहीतर जागच्या जागी भस्म करेल."
"नाही जाणार. सोडणार नाही मी यांना." इतक्यात त्या बाबाने पुन्हा अंगारा घेत त्याच्या तोंडावर मारला. तो त्या यातनांनी विव्हळत भस्म झाला.
गणेश शुद्धीवर आला होता, बाबाने त्याच्यावरही राख टाकली होती. तिघांनी त्या बाबाला धन्यवाद दिला. तो फकीर पुन्हा ठाण्याकडे जाऊ लागला. राजेश म्हणाला, "आज तुम्ही नसता तर आम्ही वाचलो नसतो."
बाबा म्हणाला, "अरे, तुझ्या हाकेला तर धावून आलो मी."
मोहन म्हणाला, "पण फकीर बाबा, इतक्या रात्री तुम्ही त्या ठाण्यात काय करत होतात?"
"मी दुरून चालत आलो होतो, दमलो म्हणून इथेच रात्र काढू म्हटलं," असे म्हणत त्या बाबाने त्यांना अंगारा देत म्हणाला, "आता सरळ घरी जा."
असे म्हणत तिघेही चालू लागले. खरं तर राजेशला समजले होते तो फकीर कोण होता, पण घरी जाण्याच्या घाईत तो गप्पपणे चालू लागला. मोहन चालता चालता मागे बघितले तर तो फकीर गायब झाला होता. ही काय भानगड आहे त्याला समजले नाही. तिघेही घरी आले.
काही वेळाने गणेशच्या घरी तिघांचे आई-वडील जमले होते. चांगलाच समाचार घेत होते तिघांचा, कारण राजेशने सगळं सांगितलं होतं.
मध्येच पांडबा म्हणाला, "अरे पण तो फकीर होता तरी कोण?"
राजेश म्हणाला, "पीर बाबा."
दुसऱ्या दिवशीच सगळे बाबाची क्षमा मागण्यासाठी गेले आणि तेव्हापासून त्या ठाण्याची व्यवस्थित निगा राखू लागले. दरवर्षी ऊरुसही काढू लागले.


कथा लेखन:- भरत