E-materials should be used in the curriculum. in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | ई साहित्याचा वापर अभ्यासक्रमात व्हावा

Featured Books
Categories
Share

ई साहित्याचा वापर अभ्यासक्रमात व्हावा

*ई साहित्याचा वापर अभ्यासक्रमात व्हावा?*       

       *शिक्षकांनी शिकणं गरजेचं आहे. तो जर शिकला तर तो वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवेल. त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवेल. त्यांना सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचवेल. तो विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करायला लावेल. विद्यार्थ्यांचा  ऐतिहासिक, भौगोलिक व इतर प्रकारचा सर्वांगीण विकास साधेल. ज्याचा परिणाम संशोधक वा इतर प्रकारचे व्यक्ती बनण्यात होईल व आपोआपच देशाला जागतिक महासत्तेची अवस्था प्राप्त होईल. देशाला विश्वगुरुही बनवता येईल. शिक्षकांनी शिकावं. त्यासाठी त्याला सहजपणे साहित्य उपलब्ध व्हावं. यासाठी सध्या ई लर्निग सुविधा आलेली आहे. ज्यात एका क्लीकवर जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून कोणालाही साहित्य प्राप्त करुन घेता येते. त्याचा वापर शिक्षकांनी करावा. विद्यार्थ्यांनाही करायला लावावा. तसेच अभ्यासक्रमातही ई लर्निंग साहित्याचा वापर व्हावा.  अभ्यासक्रम तयार करतांना ते साहित्य वापरावं. तसंच विद्यार्थ्यांनी ते साहित्य कसं वापरावं, त्याचं एस सी इ आर टी व एन सी इ आर टीनं प्रशिक्षण द्यावं. कारण सध्या डिजीटलच काळ आहे व ई लर्निंग साहित्याचा वापर करणे या काळात सहज शक्य आहे. त्यामुळंच त्याचं महत्व लक्षात घेता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं त्याबाबतीत पावले उचलावीत हे तेवढंच खरं. शिक्षक शिकलाच पाहिजे, त्यासोबतच विद्यार्थीही शिकलाच पाहिजे, हा हेतू गृहीत धरुन.*           सन २०२० ला आलेलं नवीन शैक्षणिक धोरण. ज्यात वेगवेगळ्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. ज्यात चाकोरीबद्ध शिक्षणापेक्षा चाकोरीबाहेरील शिक्षणावर भर दिला जात आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस विना दप्तराची शाळा सुरु झालेली आहे. ज्यासाठी शनिवार निवडला आहे. या दिवशी विद्यार्थी शाळेत येतात. ते दप्तर आणत नाहीत. त्या दिवशी शिक्षक त्यांच्याकडून वेगवेगळी उपक्रमं पुर्ण करुन घेत असतात. यादिवशी पर्यावरण उपक्रम, भाषीक खेळ, प्रकल्प यावर चर्चा केली जाते. आता तर नवीन शैक्षणिक धोरणानं ई बूक लर्नींगची प्रक्रियाही आणलेली आहे. शाळेशाळेत प्रोजेक्टर, मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून ई बूकचं वाचन केलं जाणार आहे.          सध्या काळ बदलला आहे. डिजीटल काळ आलेला आहे व या काळात ई साहित्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. लोकं आता प्रवासात ई बूकच वाचन करीत असतात.         पुर्वी असं नव्हतं. पुर्वीचं साहित्य हे वाचनाच्या स्वरुपात उपलब्ध असायचं. लोकं प्रवासाला जात असतांना बसमधून वा वाहनातून पुस्तके विकत घेत असत. ज्यात प्रवास दगदगीचा वाटू नये म्हणून लोकं काही आवडीची पुस्तके विकत असत. परंतु त्यात आपल्या आवडीची पुस्तके मिळत नसल्यानं ते आवर्जून ती पुस्तके विकत घेवून सोबत नेत व आपल्या वाचनाची हौस भागवत. मात्र आज तसं नाही. आज बदलत्या काळानुसार लोकं आपला मोबाईल सोबत नेतात. काही पुस्तकं वेळेवर डाऊनलोड करतात तर काही नेट प्रॉब्लेम जाईल म्हणून आधीच डाऊनलोड करुन ठेवतात.          आजच्या काळात ई डिजीटल स्वरुपाच्या लर्निगला जास्त महत्व आलेलं आहे. त्यासाठी काही ई माध्यमेही पुढं सरसावली आहेत. ही माध्यमे पुस्तके छापील स्वरुपात काढण्याऐवजी ती लोकांना डिजीटल माध्यमातून उपलब्ध करुन देत असतात. ज्यात अग्रगण्य स्तरावर ई साहित्य प्रतिष्ठान आहे. ज्यातून वेगवेगळ्या स्वरुपाची पुस्तके उपलब्ध होतात. ही पुस्तके एका क्लीकवर उपलब्ध होत असतात. या ई लर्निंगच्या विचारपीठावर अनेक ऑनलाइन स्वरुपाची माध्यमे आहेत. त्यांची नावे आहेत. मातृभारती, प्रतिलिपी, शॉपीजन, ॲमेझान, फ्लीपकार्ट, स्टोरी मिरर इत्यादी. ही माध्यमं वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित करीत असतात.          वरील प्रकारच्या माध्यमांपैकी  काही माध्यमं पुस्तक उपलब्ध करुन देतांना पैसे मागतात. कारण असतं पुस्तक लिहिण्याला व ती उपलब्ध करुन देण्याला लागणारा खर्च. पुस्तक विचारपीठावर उपलब्ध करुन देत असतांना काही तांत्रिक क्रिया प्रक्रिया कराव्या लागतात. ज्याला खर्च येतो. त्यातील काही पैसा हा लेखकांनाही द्यावा लागत असतो.           मातृभारती, प्रतिलिपी, ई साहित्य प्रतिष्ठान, शॉपीजन, स्टोरी मिरर ही लेखकांची साहित्य प्रकाशित करणारी माध्यमं. यासारखी इतरही बरीच माध्यमं आहेत. यातील काही माध्यम ही लेखकांना मानधन देत नाहीत. त्यांना लेखक विनामोबदल्यात पुस्तक उपलब्ध करुन देतात. लेखकांना वाटते की लोकांची सेवा करावी. म्हणूनच ते तसा उद्देश बाळगतात. परंतु यातील काही माध्यमं अशा लेखकांच्या पुस्तकांचा व्यापार करतात. आपण स्वतः कमवितात. बदल्यात लेखकांना काहीही देत नाहीत. तो भाग सोडला तर बाकी ई साहित्य माध्यमं चांगली आहेत.            शिक्षक....... शिक्षकांनी अभ्यास करावं असं म्हणतात. कारण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करीत असतांना शिक्षकांना शिक्षण शिकणं गरजेचं आहे. त्यामुळं शिक्षकांच्या शिकण्याला जास्त महत्व आहे. शिक्षक शिकत असतात. ते वेगवेगळे विषय वाचत असतात. असं साहित्य वाचतात की जे साहित्य विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देईल. परंतु असं साहित्य हे पुस्तक रुपात महागडं होतं. ते साहित्य वेळेच्या आत लवकर उपलब्ध होत नाही. शिवाय ते उपलब्ध करण्यासाठी मैलाचं अंतर पार करावं लागतं किंवा पोष्टानं बोलवावं लागतं. त्यासाठी बरीच त्रेधातिरपीट करावी लागते. यासाठीच ऑनलाईन ई लर्निंगची सुविधा आली. या सुविधानुसार व्यक्ती कितीही लांब अंतरावर असली वा ती विदेशात जरी असली तरी एका क्लीकवर त्या व्यक्तीचं हवं असलेलं पुस्तक एका सेकंदात उपलब्ध होवून जातं.            शिक्षकांनी शिकायलाच हवं. कारण तो जर शिकेल तर तो विद्यार्थी घडवेल, अन् त्यानं जर विद्यार्थी घडविले तर राष्ट्र घडेल. महत्वाचं सांगायचं झाल्यास शिक्षकांनी शिकावं. ई लर्निंगच्या माध्यमातून शिकावं. जेणेकरुन विद्यार्थी घडवता येईल. राष्ट्रही घडवता येईल. राष्ट्र जर घडलं तर आपोआपच देशाची विश्वगुरु बनण्याकडे जी वाटचाल सुरु आहे. ते स्वप्न साकार करता येईल. त्यातच देशाला जागतिक महासत्तेचा दर्जा प्राप्त करुन घेता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांपुर्वी शिक्षकांनी शिकणं गरजेचं. अन् त्यासाठीच ई लर्निग साहित्य महत्वपुर्ण अन् त्यासाठीच त्या साहित्याचा समावेश अभ्यासक्रमातही होणं तेवढंच महत्वाचं आहे यात शंका नाही.           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०