नियोजन; शिक्षकांनी करायलाच हवं?
नियोजन....... नियोजनाला शालेय दृष्टीकोनातून अतिशय महत्व आहे. कारण शालेय स्तरावर नियोजन नसेल तर शालेय उद्दिष्ट पुर्ण करायला मर्यादा येत असतात. शालेय नियोजन केल्यानं शैक्षक तर सक्षम बनतातच. विद्यार्थी सुद्धा सक्षम बनू शकतात.
नियोजन...... कोणतेही काम करायचे झाल्यास नियोजनाला फार महत्त्व आहे. उदाहरणार्थ एखादा विवाह प्रसंग. विवाहप्रसंगात नियोजन करतांना आपण मुलगी बघण्यापासून तर तो विवाह कसा पार पाडायचा? याचं नियोजन आधीच करीत असतो. पैसा लागत असेल तर त्याचेही नियोजन करीत असतो. विवाहसोहळ्यात कोणत्या पाहुण्यांना बोलवायचे व कोणत्या पाहुण्यांना नाही? हेही आपण निश्चित करीत असतो. त्यातच कोणत्या पाहुण्यांना अहेर घ्यायचा व कोणत्या पाहुण्यांना नाही? विवाहसोहळ्यात जेवनात कोणकोणते पदार्थ ठेवावेत, कोणते पदार्थ नाही? मंडप कसा टाकायचा? साधा टाकायचा की वर आच्छादन करायचं? कारण अलिकडील काळात पावसाचा भरवसा नाही. वऱ्हाडी नेताना गाड्या कोणत्या करायच्या? बँड कोणत्या स्वरुपाचं असावं? सभागृह करायचा की नाही? पैशाची जुळवाजुळव कशी करायची? बँकमधून कर्ज काढायचं की कोणाकडून उसणे घ्यायचे? देवादेवी करायची की नाही करायची? या साऱ्याच गोष्टीचं नियोजन आपण करीत असतो. जर ते नियोजन केलं नाही तर आपल्या घरचा विवासोहळा व्यवस्थित होत नाही.
नियोजन हे केवळ विवाह करण्यापुरतंच मर्यादित नाही. त्याशिवाय इतरही बाबी आहेत की त्याचंही आपण नियोजन करीत असतो. जसे शेती. शेती करीत असतांना शेतात काय पेरायचं? त्यासाठी जमीन कशी तयेर करायची? आरे करुन तयार करायची की साधी? ट्रॅक्टरनं शेती नांगरायची की साध्या नांगरानं? शेणखत द्यायचं की पोटॅश? सल्फेट टाकायचं की नाही? तणनाशक टाकायचं की नाही? किटकनाशक मारायचं की नाही? अन् शेवटी निघालेला माल साठवून ठेवायचं की नाही? विकायचं तर कोणत्या बाजारात विकायचं? या साऱ्याच गोष्टी शेतीकामात येत असतात.
युद्धाचंही नियोजन असतं. युद्धात शत्रूची कोंडी कशी करायची? शत्रूचा पराभव कसा करता येईल? शत्रुपक्षाकडील माहिती कशी प्राप्त करता येईल? शत्रूवर विमानातून वार करायचा की जमीनीवरुन? शत्रूचा पाडाव करतांना कोणतं शत्र वापरायचं? या सर्वच गोष्टी कराव्या लागतात. तेव्हाच युद्ध जिंकता येतं.
प्रशिक्षणातही तसंच आहे. प्रशिक्षण घेतांना जर आपल्या घरी विवाहसमारंभ असेल तर ऑनलाइन हजेरीनुसार आपल्याला घरी राहता येत नाही. कोण्या नातेवाईकाचा मृत्यू जरी झाला तरी जाता येत नाही. कोणतं अकस्मात काम जरी आलं तरी जाता येत नाही. एवढंच नाही तर. कोणाची प्रकृती जरी बरोबर नसेल तरी त्याला जाता येत नाही. एवढ्या सगळ्या समस्या असतांना आपण प्रशिक्षणात दररोज वेळेवर उपस्थित असतो. सगळ्या तासिका करतो. कारण आपण नियोजन केलेलं आहे. तसं पाहिल्यास नियोजनाशिवाय कोणत्याच गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. नियोजन ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. नियोजन नसेल तर त्या व्यक्तीची स्थिती ही न घरका न घाटका अशी होते.
शालेय स्तरावरही नियोजन असतं आणि त्याची शालेय स्तरावर अतिशय गरज असते. नियोजन नसेल तर कोणता भाग आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचा. हे आपल्याला कळत नाही. कोणत्या महिन्यात किती आणि कोणता भाग शिकवायचा. हे आपल्याला कळत नाही. कोणत्या विद्यार्थ्यांना काय शिकवायचे? ते कळत नाही.
शाळेचं नियोजन करतांना शाळेची विविध कामं, अध्ययन अध्यापन प्रक्रिया, उपक्रम, प्रशिक्षण, मूल्यांकन, मूल्यमापन या सर्वच बाबींचा विचार करावा लागतो. गुणवत्ता विकासाच्या अनुषंगानं आवश्यक माहितीचे संकलन, विश्लेषण व कृतीकार्यक्रम याचा विचार करावा लागतो. शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, व्याख्याने आयोजित करावी लागतात. विद्यार्थी घडविण्यासाठी पालकसभा घ्याव्या लागतात. भौतिक सुविधेसाठी व्यवस्थापन मंडळाची सभा घ्यावी लागते. या सर्व बाबींचं नियोजन करावं लागतं. तरच नियोजन व्यवस्थित होवून वर्ग व शाळा व्यवस्थित चालवता येतात.
शाळेत विद्यार्थी चांगले शिकवता यावेत म्हणून अभ्यासक्रमाचं मासिक व वार्षिक नियोजन करावं लागतं. तसंच शाळेत दररोजचं नियोजन हे पाठटाचनाच्या स्वरुपात करावं लागतं. त्यामुळं दररोज, महिन्याला व वर्षाला विद्यार्थ्यांना काय व कसं शिकवायचं ते कळतं. शालेय जीवनात नियोजन नसेल तर काय शिकवायचं आणि कहं शिकवायचं तेही साधं कळत नाही. याचाच अर्थ असा की कोणतेही एखादे काम करीत असतांना ते काम कसे करायचे? का करायचे? कोणी करायचे? कोणासाठी करायचे व कधी करायचे? हे आधीच ठरवणे म्हणजे नियोजन होय. अलिकडील काळात शासनानं संघटनेच्या दबावाचा विचार करुन पाठटाचन व अभ्यासक्रम नियोजन करण्याच्या कामातून आपली मुक्तता केलेली आहे. असं असलं तरी यावर्षी जी स्कॉपची माहिती भरलेली आहे, त्यात नमूनादाखल आपल्याला अभ्यासक्रम नियोजन, पाठ तासिका, दैनिक पाठटाचनाचे फोटोही अपलोड करावे लागले आहेत.
कोणतेही नियोजन हे पुल पार करण्यासारखे आहे. त्यात दोन गोष्टींचा सारासार विचार करावा लागतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण नेमके कुठं उभे आहोत? तशीच दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठे जाणार आहोत? हे सगळं करीत असतांना सगळ्यांच्या कामाचं वर्गीकरण केलं जातं. ज्यात एक मुख्य आणि जबाबदार व्यक्ती असतो. तो जबाबदारी स्विकारुन कामाचा आढावा घेत असतो. त्या आढाव्यानंतर कृती तपासून पाहतो. त्यात काही उणीवा आढळून आल्यास त्या पुर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आवश्यक साधनं पौरवतो. त्यानंतरच फलश्रुती मिळते. विवाह सोहळा, शेती करणे, युद्ध करणे या सर्व गोष्टीत अशाच प्रकारचा आढावा घेण्यात येतो. ज्यातून ते कार्य पुर्णत्वास जातं. आपल्याला माहितच असेल की जर एखाद्यावेळेस विवाहसोहळ्यात अचानक पाहूणे वाढले आणि अन्न कमी पडले तर जबाबदार व्यक्ती आचाऱ्यांना वेळीच सुचना देवून त्याची परिपुर्ती वा व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो.
आपल्याला नियोजन करावे लागते व आपण ते करतोच. कारण त्यातून कामाला दिशा प्राप्त होते. मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढते. मानवी घटकांचे मनोबल वाढते. उपलब्ध संसाधनाचा पर्याप्त वापर कसा करायचा ते आपल्याला कळत. नवीन उपक्रम करण्यास प्रोत्साहन मिळते. उद्दीष्ट साध्य होण्यास मदत होते. कार्याला प्रेरणा मिळते. आत्मविश्वास वाढतो व कार्य तडीस जात असते.
हे जरी खरं असलं तरी ज्या शालेय स्तरावर नियोजन महत्वपूर्ण बाब आहे. त्याच ठिकाणी काही शिक्षक नियोजन करीत नाहीत. ते कंटाळा करीत असतात. काही असे नातेवाईकही असतात की जे आपल्या नातसंबंधाचा फायदा घेवून शाळेत नियोजन करण्यावर भर देत नाहीत. ज्यातून विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतं.
विशेष सांगायचं झाल्यास विद्यार्थी घडविण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी नियोजन करावं. जरी शासनानं शाळेतील ताण लक्षात घेता नियोजन करण्यावर जी आर स्वरुपाचे अडथडे निर्माण केले असले तरी. कारण नियोजन करण्यातूनच विद्यार्थ्यांना काय शिकवायचे? कसे शिकवायचे? केव्हा शिकवायचे? का शिकवायचे? कोणी शिकवायचे? कोणाला शिकवायचे? या साऱ्याच गोष्टी कळत असतात. ज्यातून विद्यार्थी विकास करणे सहज शक्य होते. ज्यातून देशाचा भावी व सक्षम नागरिक बनविणेही सहज शक्य होते. ज्यातून देशाला महासत्ता बनविण्याची पावले टाकता येवू शकतात नव्हे तर टाकता येतात. यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०