नयनाला मात्र काही कमी पडू नये इकडे तिचा कटाक्ष असे .मनातले विचार बाजूला ठेवून ऊमाने नाश्त्यासाठी पोहे करायला घेतले .पोह्याच्या डिशमध्ये तिने नयनाला एक लाडू पण वाढला .“आई तु पण घे न एक लाडू ,कसला मस्त झालाय असे नयनाने म्हणल्यावर “नको ग सारखे ते पदार्थ करून माझी तर खायची इच्छाच मरते बघ.असे म्हणून ऊमाने पोहे खायला सुरवात केली .खाऊन झाल्यावर नयना बाहेरच्या खोलीत गेली .तिच्या मैत्रिणीचा फोन होता त्यावर तिचे बोलणे चालू होते .ऊमाने पण सगळा आतला पसारा आवरला .थंड झालेला लाडू चिवडा डब्यातून भरून ठेवला . आणि बाहेर येऊन पेपर चाळत बसली .थोड्या वेळाने “आज जेवायला काय करू ग नयन ?असे ऊमाने विचारताच नयना म्हणाली,“ अग आई विसरलीस का ?आज रितूचा वाढदिवस आहे ते...काल बोलले होते तुला मी .हे काय आता तिच्यासोबतच बोलत होते मी आता माझे आवरून झाले की मी तिकडेच जाणार आहे .मला जेवायलाच बोलावले आहे तिने आज .शिवाय संध्याकाळी आमच्या वर्गातल्या काही मैत्रिणींच्यासाठी तिने तिच्या घरी एक खास पार्टी ठेवली आहे .त्यामुळे संध्याकाळी मला घरी यायला थोडा उशीरच होईल बर का “हे ऐकताच ऊमा म्हणाली, “हो ग तु बोलली होतीस मीच विसरून गेले बघ ..जा तु ,घे आवरून ....तिला गिफ्ट काय घेतले आहेस ?”एक रंगीत कापडात गुंडाळलेले खोके दाखवुन नयना म्हणाली ,“हे बघ कालच आणले आहे ग हे तिचे आवडते सेंट ..तुला काही पैसे हवेत का खर्चासाठी असे ऊमाने विचारल्यावर नयनाने नकार दिला .“आहेत ग पैसे तु दिलेले माझ्याकडे ,संपले की घेईन ना मी मागुन असे म्हणून नयना स्वतःचे आवरायला आत गेली .दिलेले पैसे नयना नेहेमीच नीट आणि निगुतीने वापरत असे.बाहेरचे कोणतेच पदार्थ नयना कधीच खात नसे .बाहेरचे काहीच खाणे नसे मेकअप ,महागडे कपडे, कॉस्मेटिक्स हे ही नयना वापरत नसे .सिनेमा नाटकाचा फारच छंद नव्हता ,बाकी कुठे काही खर्चही नसे . इतर कोणताही वायफळ खर्च करण्याची तिला सवय नसल्याने दरमहा ऊमाने पॉकेटमनी म्हणून दिलेले पैसे तिच्याकडे जसेच्या तसे शिल्लक असत .नयना तिचे आवरून बाहेर आल्यावर ऊमा तिच्याकडे एकटक पहातच राहिली!!हलक्या गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता ,त्यावर शोभेसे कानातले आणि गळ्यातले .एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट .तिच्या मनात आले ....किती मोठी झालीय आपली मुलगी .!!आणि केवढी सुंदर दिसते आहे...चेहेऱ्यावर फक्त हलकी पावडर ,डोळ्यात काजळ,आणि कपाळाला छोटीशी टिकली .कोणत्याच मेकअपची हीला काहीच गरज नाही .गोरापान चमकदार रंग उंचनिंच आणि कमनीय बांधा लांबसडक जाड पण रेश्मासारखे मऊ काळेशार ,थोडीशी सोनेरी झाक असलेले केस मोठे मोठे काजळ घातल्यासारखे वाटणारे डोळे कमानदार गुलाबी जाडसर ओठ ..आणि उजव्या गालावर थोडा खाली असणारा काळाभोर गडद तीळतिचे केस तेवढे ऊमासारखे लांबसडक होते .बाकी सर्व मात्र अगदी सतीशची “प्रतिकृती” ..!!तसाच गोरा रंग ,उंचनिंच बांधा ,मोठे डोळे ..नयनाच्या जन्माच्या वेळी तिच्या उजव्या गालावर पुसट दिसणारा तीळ पाहिला तेव्हा सतीश खुशीने म्हणाला होता .बघ माझ्याप्रमाणे माझ्या लेकीला सुद्धा गालावर तीळ आहे की नाही ?तिचे काळेभोर डोळे पाहूनच त्याने तिचे नाव नयना ठेवायचे ठरवले होते. नयनाला पाहिल्यावर सतीशला ओळखणाऱ्या कोणालाही सहज समजले असतेकी ही त्याचीच मुलगी आहे !!! त्याच्यासारखेच हुबेहूब रूप होते तिचे ..“सतीश” ..ऊमाचा नवरा आणि नयनाचा पिता !!!सतीशचे नाव ओठावर येताच आणि त्याची आठवण येताच ऊमाच्या तोंडात एककडवट चव गोळा झाली .कशाला आली आपल्याला ही आठवण ..?...असे तिला वाटले “आई अग किती वेळ पहाते आहेस माझ्याकडे ...काय झालेय तुला ?”नयनाचे शब्द ऐकुन ऊमा भानावर आली आणि म्हणाली “काही नाही ग तुलाच बघत होते ..दृष्ट काढुन टाकावी की काय तुझी ...असा विचार आला मनात ..”“चल ग आई काहीतरीच तुझे ..इतका काही मी नट्टा पट्टा केलेला नाहीये .”नयना मोठे डोळे करून हसत म्हणाली ऊमा पण हसली आणि तिचा गालगुच्चा घेऊन म्हणाली “माझी परी आहेस तु ..लाडकी ..!!!नयना एकदम गोड हसली आणि म्हणाली “झाले का तुझे कौतुक ..जाऊ का मी आता ?“थांब जरा ताजे लाडू आणि चिवडा देते आज केलेला रितूला खुप आवडतो ..”असे म्हणत ऊमाने पाच सहा लाडू आणि थोडा चिवडा एका बॉक्समध्ये घालून दिला .“खरेतर तुलाही बोलावले आहे रितुच्या आईने...पण तु येत नाहीस ना कुठल्याच कार्यक्रमाला . नयना म्हणाली “नको ग आग्रह करूस ..आणि मला आता बाजारात पण जायचे आहे काही सामान आणायला जेवण करून मग बाजारात जाईन मी रितूला फोन करून देईन मी आशीर्वाद “ ऊमा म्हणाली “चालेल पण रितुला फोन करायला विसरू नकोस बर का ..”असे सांगुन पायात चप्पल घालून पर्स घेऊन नयना बाहेर पडली .ऊमा पण स्वयंपाकाला लागली .आता तिच्यापुरताच भात आमटी करायची होती .आत्ताच दोन पोळ्या संध्याकाळच्या करूनच ठेवाव्यात म्हणजे संध्याकाळी काही करायला नको .नयना आता संध्याकाळी सुद्धा काहीच जेवणार नाही .स्वयंपाक आटोपून गेले म्हणजे बाजार पण होईल निवांतशीर आले की जेवण करून पडता येईल जरासे .अशा विचाराने ऊमा स्वयंपाकाला लागली .पण सतीशचे विचार काही केल्या तिचा पिच्छा सोडेनात ..सतीश म्हणजे तिच्या आयुष्यातले एक काळे “पर्व” होते .नयना सारखी देखणी आणि हुशार मुलगी सोडता लग्न झाल्यापासुन आजपर्यंत त्याने ऊमाच्या डोक्याला फक्त ताप आणि तापच दिला होता .कोणत्या मुहूर्तावर त्याच्याशी लग्नगाठ मारली गेली होती कोण जाणे....!धड चौकशी पण केली नव्हती त्याची काकांनी आणि ....आपणही .काकांचे तेव्हा वय झाले होते आणि आपली जबाबदारी त्यांना पार पडायची होती .पण आपण एवढ्या सुशिक्षित होतो ..निदान आपण तरी पुढे होऊन त्या स्थळाची चौकशी करायला हवी होती. त्याच्याविषयी लग्नानंतर एक एक समजायला लागल्यावर मग पश्चात्ताप झाला होता पण तेव्हा काहीच उपयोग नव्हता आणि काही करता पण येत नव्हते कारण एव्हाना नयनाचा जन्म झाला होता .ऊमाची अवस्था त्या वेळेस दगडाखाली हात अडकल्यासारखी झाली होती .पोळी भाजताना अचानक गरम पोळीची वाफ हातावर आल्यावर ऊमाने स्स... हाय... असा उद्गार काढला .आणि सतीशचे विचार डोक्यातून काढुन टाकायचा ती प्रयत्न करू लागली . पण एकदा मन जे अस्वस्थ झाले होते ते परत जाग्यावर येईना .आणि तिचे मन परत परत भूतकाळात जाऊ लागले .एक वर्षभर नोकरी केल्यावर काकांचा आता लग्न कर असा तगादा ऊमाच्या मागे सुरु झाला .शेजारी,पाजारी,ओळखीच्या लोकांकडे आमच्या ऊमासाठी स्थळ पहा असे निरोप द्यायला त्यांनी सुरु केले ऊमासाठी सतीशचे स्थळ आले तेव्हा ते नक्की कोणी सुचवले ते समजलेच नाही .एके दिवशी अचानक सतीश स्वतःच एका मित्रासोबत घरी आला होता .ऊमा तर तेव्हा घरी नव्हती. काका काकूंवर मात्र त्याने आपली चांगलीच छाप पाडली .उंचनिंच ,एकदम देखणा ,गोड बोलणारा ,एका सरकारी ऑफिसमध्ये नोकरीला असणारा सतीश काकांना मात्र आवडला .सतीश समर्थ असे त्याने आपले नाव सांगितले मात्र सोबत घरचे कोणी कसे आले नाही असे विचारल्यावर आपल्याला आईवडील नाहीत,लहानपणीच ते वारल्याने आपण अनाथाश्रमात वाढलो आहोत, व तिथेच शिकलो आहोत .आपण आपली काळजी घ्यायला समर्थ असल्याने हे “समर्थ “आडनाव आपण लावले आहे असे त्याने स्पष्टच काकांना सांगितले.काकांना त्याचा प्रांजळपणा पटला आणि आवडला सुध्धा .अनाथ असणे ही काही त्या व्यक्तीची चुक तर होऊ शकत नाही ना .तेव्हा त्याने आपल्याविषयी इतर माहिती स्वतःच काकांना सांगितली होती ..
क्रमशः