रोजच्या सवयीप्रमाणेच आजही रात्री आठ वाजता कामावरून घरी आल्यानंतर जेवण करुन वैभव वरच्या खोलीमध्ये जावून मोबाईल पाहत बसला. बायकोचे भांडी व इतर कामे आवरेपर्यंत तो वरच्या खोलीमध्ये जावून मोबाईल पाहत बसायचा. मोबाईलवरील विविध प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेबसिरीज पाहायचा. तर कधी नुसता इंस्टाग्रामवर रिल्स पाहत बसायचा. तर कधी फेसबुक चाळत बसायचा. सुट्टीच्या दिवशी तर तो नऊ ते दहा भागांची वेबसिरीज पाहून संपवायचा.
अन्न, वस्त्र, निवारा या माणसांच्या मुलभूत गरजांव्यतिरिक्त मोबाईल ही त्याची चौथी मुलभूत गरज झाली होती. सकाळची सुरुवात त्याची मोबाईलमध्ये पाहूनच व्हायची. व्हॉट्सअपवर कोणाचा मेसेज आला. आपले स्टेटस कोणी पाहिले. कोणी काय स्टेटस ठेवले. हे काम तो सकाळी झोपतून उठल्याबरोबर करायचा. एवढंच काय सकाळी शौचास गेल्यानंतरही मोबाईल त्याच्या सोबतच असायचा. मोबाईल पाहत अर्धा तास निघून जायचा तरी त्याच्या लक्षात यायचं नाही. त्याला दुसरे कोणतेच व्यसन नव्हते. पण तो अतिप्रमाणात मोबाईच्या आहारी गेला होता.
त्याला मोबाईलचं व्यसन जडलं होतं. त्यामुळे त्याला या गोष्टीचं वाईट वाटायचं. तो एक साहित्यीक होता. मोबाईलमुळे त्याचे वाचन व लिखाण दोन्ही बंद झालं होतं. त्याने बऱ्याच वेळा मोबाईलची सवय मोडण्याचा प्रयत्न केला होता. पण मोबाईलच्या बाबतीत त्याचं त्याच्यावर नियंत्रण नव्हतं.
साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याला त्याच्या बायकोचा वैशालीचा फोन आला. आता तिचं आवरलं होतं. पाच वर्षांची मुलगी रिया जागीच होती. दीड वर्षांचा शिव झोपलेला होता. वैभव बेडरुममध्ये येवून बिछान्यावर झोपला. बिछान्यावर पडल्यावरही तो मोबाईल पाहतच होता. रियाही आईचा मोबाईल घेवून त्यावर कार्टुन पाहत होती. वैशाली रियाला मोबाईल पाहणं सोडून झोपण्यासाठी दोन - तीन वेळा रागावली होती. पण रिया तिचं ऐकत नव्हती. वैशाली वैभवचं निरीक्षण करीत होती. तिच्या लक्षात आलं होतं. काही दिवसांपासून वैभव तिच्याकडे व मुलांकडे दुर्लक्ष करत होता. मोबाईलपुढे आपली एक बायको व दोन मुले आहेत ही बाब तो विसरुन गेला होता. रात्रीचे साडे अकरा वाजले होते. मोबाईल पाहता पाहता आता त्याला झोप लागली होती. वैभवने मोबाईल बाजूला ठेवला. रिया मोबाईल पाहतच होती. वैभव तिच्यावर रागावला. त्याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यामुळे ती रडू लागली. वैभवला खूप झोप आली होती. रियाच्या रडण्याने तो वैतागला. आणि वैशालीला ओरडून म्हणाला.
“ मला उद्या कामावर जायचे आहे. झोप नाही झाली तर काही सुधरत नाही. रियाला लवकर झोपी घाल.”
वैशालीने रियाला आपल्या कुशीत घेतले. तरीही रिया रडतच होती. त्यावर वैभव वैशालीला म्हणाला,
“ तुझं मुलांकडे अजिबात लक्ष नाही. लहान वयात तुच त्यांना मोबाईलची सवय लावली आहेस. शिवला पण खाताना मोबाईल लागतो. डोळे खराब होतील ना त्यांचे.”
वैशाली समजदार होती. तिला माहित होतं. वैभव रागात असताना त्याला काही बोललं तर तो जास्तच चिडतो. उद्या त्याला कामावरही जायचं आहे. त्यामुळे ती शांत बसली. आपले पप्पा रागावले आहेत. हे रियाच्या लक्षात आलं. आता आपण रडलो तर नक्की एखादा फटका खावा लागेल हे तिच्या लक्षात आले. आणि त्यामुळे ती शांत झाली.
दुसऱ्या दिवशी वैभव कामावरून घरी आला. त्याने जेवण केले. आणि तो नेहमीप्रमाणे मोबाईल पाहण्यासाठी वरच्या खोलीमध्ये निघून गेला. काम आवरल्यानंतर रात्री अकरा वाजता वैशालीने त्याला फोन केला. तो खाली आला. बिछान्यावर पडला. आणि लोळत लोळत तो मोबाईल पाहू लागला. वैशालीला माहित होतं. उद्या रविवार असल्यामुळे वैभवला उद्या सुट्टीच आहे. आता तो किमान दोन ते तीन वाजेपर्यंत मोबाईल पाहत बसेल.
ती त्याच्याकडे हसत पाहत त्याला म्हणाली.
“ तुम्ही लग्न नेमकं माझ्याशीच केलं आहे ना ?”
तिला काय बोलायचे आहे हे त्याच्या लक्षात आले नाही. त्याने मोबाईलच्या स्क्रिनवरुन नजर बाजूला करुन तिच्याकडे पाहत विचारले.
“ काय म्हणालीस? ”
तिला माहित होतं. वैभवचा स्वभाव चिडचीडा आहे. तो थोडया गोष्टीवर लगेच रागावतो. त्यामुळे तिने त्याला परत हसत विचारले.
“ तुम्ही लग्न नेमकं माझ्याशीच केलं आहे ना ? का मोबाईलशी केलंय. ”
आता तिच्या प्रश्नाचा रोख त्याच्या लक्षात आला. तो मोबाईल बाजूला ठेवत म्हणाला.
“ दिवसभर कामामुळे कंटाळून जातो गं. त्यामुळे थोडे मनोरंजन म्हणून मोबाईल पाहतो.”
ती म्हणाली,
“ तुम्ही मोबाईल पाहू नका असं मी म्हणत नाही. पण तुम्ही मोबाईलसाठी वेळ ठरवून द्यायला हवा. मला वेळ नाही दिला तरी चालेल. पण आपल्या मुलांना तुम्ही वेळ द्यायला हवा. तुम्ही कामावरून आल्यापासून झोपेपर्यंत मोबाईलवर वेळ वाया घालवता. थोडा वेळ आपल्या कुटुंबाला दिला तर काय हरकत आहे. ”
त्याला तिचे बोलणे ऐकून राग आला. पण त्याला तिचे बोलणेही पटले. त्याला त्याची चूक लक्षात आली.
तो म्हणाला,
“ हो. माझ्याही ते लक्षात आलं आहे. पण मला मोबाईलची सवय झाली आहे. मी खूप वेळा जास्त वेळ मोबाईल पाहायचा नाही असं ठरवलं होतं. पण त्याबाबतीत माझं माझ्यावर नियंत्रण राहत नाही. ”
ती म्हणाली,
“ वाईट वाटून घेवू नका. पण आपल्या चांगल्यासाठीच आज मी जरा तुम्हाला स्पष्ट बोलत आहे. तुम्ही मोबाईलच्या एवढे आहारी गेला आहात की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्हाला मोबाईल जवळ लागतो. मोबाईल जरासा जवळ नसेल तर तुम्ही बेचैन होता. एवढंच काय तुम्ही सकाळी टॉयलेटमध्ये जातानाही
मोबाईल सोबत घेवून जाता. मोबाईलची बॅटरी उतरली तरी तुम्ही बेचैन होता.”
तो म्हणाला,
“ तुझं अगदी खरं आहे. मी मोबाईलच्या खूप आहारी गेलो आहे. ते माझ्याही लक्षात आले आहे. काही दिवसांपूर्वीच मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम यावर मी रायटींग ॲपवर एक लेख लिहिला आहे. पूर्वी माणसाची नाळ गावाशी, नात्यांशी आपल्या माणसांशी जोडलेली असायची. आज मोबाईलशी जोडली आहे. भावना मोबाईलशी जोडल्या गेल्या आहेत. वेगवेगळया भावनांचे इमोजी देखील मोबाईलवर उपलब्ध आहेत. माणसं मोबाईलने जेवढी जवळ आली. तेवढीच दुरावली देखील. मीही मोबाईलमुळेच तुमच्यापासून दूर गेलो आहे.”
ती म्हणाली,
“ तुम्ही घरी तर वेळ देतच नाहीत. पण नातेवाईकांनाही वेळ देत नाहीत. मोबाईलवर लहान मुलांपासून मोठयापर्यंत सर्वचजण व्यस्त असतात. काल रिया मोबाईल पाहत होती. तर तुम्ही माझ्यावरच रागावलात. पण मुलं मोठयांचेच अनुकरण करत असतात. तुम्ही मुलांना वेळ देत नाहीत. तुम्ही म्हणता वाचनासाठी मला वेळच मिळत नाही. वेळ काढला तर बरोबर वेळ मिळतो. तुमचा तो लेख मीही वाचला आहे. तुम्हीच त्यामध्ये लिहिले आहे. मोबाईलवर रोजचे सात ते आठ तास वेळ वाया घालणाऱ्या लोकांना व्यायामासाठी, वाचनासाठी, फिरण्यासाठी मात्र वेळ नसतो.”
तिचे बोलणे ऐकून तो हसला. आणि म्हणाला.
“ रिल्स पाहण्यात कसा वेळ निघून जातो ते कळत देखील नाही. दिवसभराच्या कामातून मोबाईलसाठी ठरावीक वेळ दिला पाहिजे.आणि आपल्या माणसांनाही वेळ दिला पाहिजे. आमच्या लहाणपणी मोबाईल नव्हते. त्यावेळी आम्ही मित्राच्या घरी त्याला बोलवायला जायचो. त्यामुळे मित्राच्या कुटुंबाशीही आपण जोडले जायचो. मित्र घरी जेवण करत असताना आपण त्याच्या घरी गेलो. तर त्याची आई आग्रहाने जेवायला बसवायची. आता मोबाईलमुळे मित्रांच्या घरी जाणे होत नाही. त्यामुळे मित्रांच्या कुटुंबापासूनही आपण दुरावलो आहोत. पूर्वी माणसं एकत्र जमायची. आणि गप्पा मारायची. एकमेकांशी संवाद साधायची. हितगुज सांगायची. आजही माणसं एकत्र जमतात आणि एकत्र बसतात पण मोबाईलमध्ये डोकावतात.”
वैभवने आता स्वत: मान्य केले आहे. त्यामुळे त्याला आणखी समजावून सांगण्यासाठी हीच चांगली संधी आहे ही बाब वैशालीच्या लक्षात आली. ती म्हणाली.
“ मोबाईल माणसाच्या खाजगी आयुष्यातही खूप डोकावत आहे. आज आपला मुड कसा आहे? आपण आज काय खाल्ले? आपण कोठे जात आहोत? या सर्व गोष्टी आपण मोबाईलवर लिहितो. एखादा व्यक्ती सुट्टीच्या दिवशी आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवत आहे. तेवढयात त्याच्या बॉसचा कामाबद्दल एखादा मेसेज त्याच्या व्हॉटस्अपला येतो. त्या मेसेजमध्ये त्या कामाचे महत्व व ते तात्काळ करणे किती आवश्यक आहे याबाबत लिहिलेले असते. ते वाचून क्षणभरापूर्वी आनंदी असलेला तो व्यक्ती निराश होतो. चिडचिडा होतो.”
वैभव हसत म्हणाला,
“ चांगला मुद्दा पकडतेस. आपण फिरायला गेलो होतो. त्यावेळी मला कामासंदर्भात असा मेसेज आला होता. आणि मी रागावलो होतो. हे तुझ्या चांगलं लक्षात राहीलं. बरोबर आहे तुझं. एखादा मेसेज किंवा एखादा फोन चांगल्या मुडची वाट लावून जातो.”
त्याच्या बोलण्यावर वैशाली हसली.
वैभव पुढे म्हणाला,
“ मोबाईलचे चांगले परिणाम आहेत. पण मोबाईलच्या अती वापराचे दुष्परिणाम माझ्यासारख्या भरपूर जणांच्या लक्षात येत नाहीत. माणसाच्या आयुष्यातील अर्धा वेळ झोपेमध्ये जात आहे. उरलेल्या अर्ध्या वेळापैकी अर्धा वेळ मोबाईलमध्ये खर्च होत आहे. त्यामुळे माणूस परिपूर्ण आयुष्य जगण्यापासून वंचित राहत आहे. एका कुटुंबामध्ये पाच व्यक्ती असतील तर त्या सर्वांजवळच मोबाईल आहेत. प्रत्येकाकाडे साधारणत: तीस हजार रुपयांचा मोबाईल असल्याचे जरी गृहीत धरले. तरी त्या कुटुंबामध्ये जवळपास दीड लक्ष रुपये फक्त मोबाईलवर खर्च होतात. त्यामध्ये बरेच जण सहा महिण्याला किंवा वर्षाला मोबाईल बदलतात. मोबाईल कसा आहे यावरून व्यक्तीची ऐपत ठरवली जाते. माणसाने काळासोबत बदललं पाहिजे. या उक्तीचा माणसाने चुकीचा अर्थ घेतला असल्याचे दिसून येते. माणूस काळासोबत जरा जास्तच बदलत आहे.”
वैशाली म्हणाली,
“ कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा आपल्या विनाशास कारणीभुत ठरतो. गरजेनुसार वापरणे व गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापरणे यामध्ये फरक आहे. आज मोबाईलवर आपले खूप मित्र-मैत्रीणी आहेत. आपण मोबाईलवर सगळयांशी जोडलेले असलो तरी मनाने मात्र एकटे पडत चाललो आहोत.”
वैभव हसत म्हणाला,
“ माझ्या लेखातील बरेचशे वाक्य तुला जशास तसे पाठ आहेत. मोबाईलवर आपले नियंत्रण असायला हवे. परंतू मोबाईलचेच आपल्यावर नियंत्रण आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांचा बराच वेळ मोबाईलवर खर्च होत आहे. त्यामुळे अभ्यास करणाऱ्या व इतर क्षेत्रात मेहनत करणाऱ्या तरुणांचे प्रतीस्पर्धी नक्कीच कमी झाले आहेत. जे मोबाईलला टाळतात. कामापुरताच मोबाईलचा वापर करतात. तेच आज यशस्वी होताना दिसत आहेत. आजकाल जन्मदिवसाच्या शुभेच्छा, नविन घर घेतल्याच्या शुभेच्छा, नविन गाडी घेतल्याच्या शुभेच्छा आपण मोबाईलवरच देतो. इतकेच काय एखाद्या ग्रुपला एकाच दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा व भावपूर्ण श्रद्धांजली या दोन्ही पोस्ट पडतात. मग एखाद्याकडून ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली आणि जो मयत झाला आहे त्याच्या फोटोला वाढदिवसाच्या शुभेच्छा चुकून पडतात.”
वैभवच्या बोलण्यावर वैशाली हसली.
वैभव पुढे म्हणाला,
“ मोबाईलमुळे जग जवळ आले आहे. हे जरी खरे असले तरी माणसं मनाने एकमेकांपासून दूर जात आहेत. बदलत्या काळासोबत मोबाईलचा वापर कामापुरता करावा. पण अतिवापर करु नये. आणि महत्वाचं आपण मोबाईलचा वापर करावा. मोबाईलने आपला वापर करु नये.”
त्याच्या बोलण्यावर वैशाली हसत म्हणाली,
“ तुम्हाला मोबाईलच्या अति वापराचे एवढे दुष्परिणाम माहित आहेत. तरी तुम्ही मोबाईल वापरता. सॉरी तुम्ही मोबाईल वापरत नाहीत. तर मोबाईलच तुमचा वापर करत आहे.”
तेवढयात वैभवच्या व्हॉटसअपवर त्याचा मित्र दिपकचा मेसेज आला. त्याने लिहिलं होतं.
‘ वैभव! आताच तुझा ‘मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम’ हा लेख वाचला. आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आता या क्षणापासून मी मोबाईलचा अति वापर करणे टाळत आहे. धन्यवाद !’
तो मेसेज त्याने वैशालीला दाखवला. आणि तो वैशालीला म्हणाला,
“ आज माझं लिखाण सार्थकी झालं. मी लिखाणाच्या माध्यमातून लोकांना सांगतो. पण त्याप्रमाणे माझ्यामध्ये बदल करत नाही. ही माझ्यासाठी खूप लाजीरवाणी बाब आहे. आज या क्षणांपासून मी मोबाईलचा अति वापर करणे टाळत असल्याचा संकल्प करत आहे.”
असे म्हणून त्याने मोबाईल बाजूला ठेवला. त्या दोघांचे संभाषण त्यांची लाडकी मुलगी रिया ऐकत होती. ती म्हणाली.
“ पप्पा ! आता मीही मोबाईल पाहणं सोडून देणार आहे.”
तिच्या गोड बोलण्याने दोघेही हसले. वैभवने आपल्या लाडक्या लेकीला जवळ घेतले. आणि त्याने मनोमन ठरवले. आजपासून मोबाईलचा अतिवापर करणे टाळायचे. आधी आपल्या कुटुंबाला आणि आपल्या वाचन आणि लिखाण या कलेला प्राधान्य द्यायचे. आणि त्या दिवसापासून त्याने आपल्या संकल्पाप्रमाणे कुटुंबाला वेळ देत मोबाईल सोडून पुस्तकांशी मैत्री केली.