manuski in Marathi Short Stories by संदिप खुरुद books and stories PDF | माणूसकी

Featured Books
Categories
Share

माणूसकी

डोंगराच्या कुशीत वसलेलं चारशे उंबऱ्यांचं आनंदवाडी हे छोटसं गाव. गावाला वळसा खळखळ वाहणारी नदी. डोंगर आणि गावाच्या मध्ये असलेली सुपीक जमीन. आणि त्या गावातील कष्टकरी आणि माणुसकीने वागणारी प्रेमळ माणसं. त्यामुळे आनंदवाडी गावाची पंचक्रोशीत एक वेगळीच ओळख होती. त्या गावात सर्व जाती, धर्माची लोकं गुण्या गोविंदाने नांदत होती. गावातील कोणत्याही जातीतील माणसाच्या घरी शुभकार्य असेल तर जात न पाहता सर्व गाव त्या कुटुंबाच्या मदतीला धावायचा. कार्यक्रमा निमित्त जेवणासाठी सर्व गावकऱ्यांना चूलबंद आवतनं (जेवणासाठी निमंत्रण) असायचं. गावातील कोणीतीही व्यक्ती मयत झाली तर सर्व गाव त्या कुटुंबाच्या दुखात सहभागी व्हायचं. त्याच चांगल्या गावामध्ये आजच्या नव्या पिढीतील दोन जिवलग मित्र राहत होते. सचिन आणि वैभव. गावातील लोकांचं सर्व सुरळीत चाललं होतं. पण अचानक त्या गावाला कोणाचीतरी नजर लागली.

            लोक एकमेकांचा द्वेष करु लागली.  कोणी कोणाच्या दु:खात सहभागी होईना. उलट दुसऱ्याला झालेलं दु:ख पाहून लोक आनंदी होवू लागली. कोणी कोणाच्या शुभकार्यात सहभागी होईना. त्याचं कारण हे त्या गावात वाढलेला जातीभेद होतं. गावात पेटलेल्या जातीवादाच्या कारणावरून एका मुद्यावर चर्चा करत असताना मतभेद होवून सचिन आणि वैभवचंही बिनसलं होतं. पहिल्यांदा सुख, समाधानाने वागणारी माणसं आता एकमेकांचा द्वेष व ईर्षा करत होती. त्यामुळे सर्व गावकरी आपल्या मनाचे समाधान गमवून बसले होते. त्या गावामध्ये सर्वच जाती, धर्माची घरे होती. पण मुख्य दोन जाती होत्या. आणि त्या मुख्य दोन जातींपैकी सचिन एका जातीचा आणि वैभव दुसऱ्या जातीचा होता. बालपणापासून आजपर्यंत त्या दोघांच्या मैत्रीत कधीच कटुता आली नव्हती. पण या जातीभेदामुळे ते दोघे जीवलग मित्र दुरावले होते.

            लहानशा गावामध्ये दोन किराणा दुकाने होती. ती दोन्ही दुकाने दोन वेगवेगळया मुख्य जातीतील लोकांची होती. किराणा सामान खरेदी करण्यासाठी लोक आपापल्या जातीच्या दुकानदाराकडे जात होती. गावामध्ये ज्या जातीची एक-दोन घरे होती. त्यांना मात्र किराणा सामान खरेदी करण्याची मोठी पंचाईत झाली होती. गावामध्ये कोणाला बोलावे ? कोणाला बोलू नये ? याचीही मोठी पंचाईत झाली होती. गावच्या सप्ताहामध्ये किर्तनासाठी आणावयाच्या महाराजाची जात पाहिली जात होती. गावातील प्रत्येक माणसाच्या मोबाईलवर आपल्या जातीचा व्हॉटसअप ग्रुप होता. ज्याला त्याला आपली जात प्रिय झाली होती. जो तो आपल्या जातीचा अभिमान बाळगत होता. आणि इतर जातींचा द्वेष करीत होता. गावामध्ये सातवीपर्यंत एक जिल्हा परिषद शाळा होती. शाळेमध्ये जाणारी मुलेही आपापल्या जातीच्या मुलांशी मैत्री करत होती. दुसऱ्या जातीतील मुलांशी भांडत होती.

            आपला भारत देश स्वातंत्र होवून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. जातीभेद कमी व्हायला हवा. परंतू जातीभेद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जी मुले देशाचं भविष्य आहेत. तीच मुले जर जातीच्या नावाखाली असा एकमेकांचा द्वेष करु लागली. तर पुढे देशाचे काय होईल ? असा विचार तेथील शिक्षकांच्या मनात येत होता. पण तेही परिस्थतीपुढे हतबल झाले होते.

           

            जातीवाद ही गोष्ट आपल्या गावासाठी आणि आपल्या भविष्यातील पिढीसाठी किती घातक आहे. ही बाब आता सचिन आणि वैभवच्या हळूहळू लक्षात येत होती. पण गावातील दोन्ही गटातील काही मंडळी जातीवादाला खतपाणी घालत होती. दोन्हीही मित्रांना एकमेकांना बोलण्याची ईच्छा होत होती. पण सद्या गावातील जातीवाद सर्वोच्च शिखरावर पोहचला होता. दोन्ही  बाजूंची लोक एकमेकांचा जीव घेण्याची भाषा करीत होती. माणसांच्या जाती माणूसजातीला घातक झाल्या होत्या. कोणीच एकमेकांना समजवून घेण्याच्या तयारीत नव्हते. त्या गावातील लोक एकमेकांचा द्वेष करत असल्यामुळे सुख, शांती आणि समाधान गमावून बसली होती. संपूर्ण गाव दहशतीमध्ये होता. कारण कधी काय होईल सांगता येत नव्हतं. दोन्ही बाजूंची लोक हत्यारानिशी सज्ज होती. कोणत्याही एका बाजूने सुरुवात झाली असती तर त्या गावामध्ये भयंकर कत्तल झाली असती. लोकांच्या मनात इतर सर्व गोष्टी सोडून फक्त जातीवाद भरला होता. सुशिक्षीत आणि चांगल्या विचारांचे सचिन आणि वैभव या गोष्टीमुळे अस्वस्थ झाले होते. पण काय करावं हे त्यांना सुचत नव्हते. गावात जातीवाद वाढल्यापासून ते दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. पण त्यांना आपल्या                                                           गावाची अशी अवस्था पाहवत नव्हती. ते दोघे एकत्र आल्याशिवाय गावातील वातावरण निवाळणार नव्हते.

            एके दिवशी सकाळीच सचिनचे वडील अशक्तपणामुळे अचानक आजारी पडले. वैभवने त्यांना गावातील डॉक्टरांकडे नेले. पण त्यांनी जिल्हयाच्या ठिकाणच्या हॉस्पीटलला घेवून जाण्याचा सल्ला दिला. वडीलांना घेवून सचिन जिल्हयाच्या ठिकाणच्या हॉस्पटीलला गेला. वैभवला ही बातमी कळाली. त्याला राहवलं नाही. तोही सचिनच्या वडीलांच्या काळजीपोटी हॉस्पीटलमध्ये आला.

             सचिन आयसीयु रुमच्या बाहेर उभा होता. वैभव त्याच्याजवळ गेला.

            त्याला म्हणाला,

            “ काकांची तबीयत कशी आहे? ”

            सचिन म्हणाला,

            “ अशक्तपणामुळे डॉक्टरांनी ॲडमीट करुन घेतले आहे. रक्त चढवले आहे. तबीयत पुर्ववत होण्यास तीन - चार दिवसांचा कालावधी लागणार असल्यामुळे तोपर्यंत हॉस्पीटलमध्ये थांबण्यास सांगीतले आहे.”

            ते दोघेही आयसीयु रुममध्ये आले. सचिनची आई त्याच्या वडीलांच्या बेडच्या बाजूला खुर्चीवर बसलेली होती. त्याच्या वडीलांना सलाईनद्वारे रक्त चढवले जात होते. वैभव आलेला पाहून सचिनच्या वडीलांना अतिशय आनंद झाला. आजारी असतानाही त्यांच्या डोळयांमध्ये आनंदाची चमक जाणवली. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. सचिनची आईही खूप खूष झाली.

            वैभव म्हणाला,

            “ काकांना दवाखान्यात आणल्याचं मला कळालं आणि मी लगेच ईकडे आलो.”

            सचिनची आई म्हणाली,

            “ तुम्ही दोघेही एकमेकांच्या मदतीला न सांगता लहाणपणापासूनच येता. सचिनला भाऊ नाही. पण तू सदैव त्याच्यासोबत भावासारखाच राहतो. त्यामुळे मला कोणतीही चिंता राहत नाही.”

            तेवढयात तेथे सचिनची मोठी बहीण आदिती तिच्या नवऱ्यासोबत जेवणाचा डब्बा घेवून तेथे आली. ते जिल्हयाच्या ठिकाणीच राहत होते. त्यांचे घर त्या हॉस्पीटलच्या जवळच होते. आदिती चार दिवस रोज जेवणाचा डब्बा आणणार होती. त्यामुळे हॉस्पीटलमध्ये राहण्याची काही अडचण नव्हती.

            सचिनची आई सचिन आणि वैभवला म्हणाली,

            “ मी आज येथेच थांबते. माझ्या सोबत आदिती आहे. सुनबाई आणि छोटं बाळ दोघेच घरी आहेत. त्यामुळे सचिनला घरी परत जाणे आवश्यक आहे. आता साडेसात वाजत आले आहेत. सव्वाआठ वाजता गावाकडे जाणारी शेवटची बस आहे. तुम्ही दोघेही आता गावाकडे जा. नाहीतर पुन्हा गाडी मिळणार नाही.”

            वैभव म्हणाला,

            “ मी चारचाकी गाडी घेवून आलो आहे. बिघाड झाल्यामुळे गॅरेजवर लावली आहे. त्यांनी उद्या दुरुस्त होईल असे सांगीतले आहे. आज गाडी दुरुस्त झाली असती तर आम्ही आणखी थोडा वेळ थांबून गाडीने गेलो असतो.”

            सचिनने काही पैसे आईकडे दिले. आई-वडील व बहीण आणि भाऊजींवर निरोप घेवून ते दोघे आपल्या गावाकडे परत जाण्यास निघाले. वाटेमध्ये रिमझीम पाऊस चालू होता. ते रिक्षाने बसस्थानकावर आले. काही कारणाने सव्वा आठ वाजताच्या बसला येण्यास उशीर झाला.ती बस नऊ वाजण्याच्या सुमारास आली. ते दोघेही बसमध्ये बसले.

            वैभव म्हणाला,

            “ आज तुझी चूक झाली. तू आपल्या मैत्रीपेक्षा जातीला मोठे समजलेस. काका आजारी असताना आणि माझ्याकडे मोठी गाडी असताना तू काकांना बसने दवाखान्यात घेवून आलास.”

            सचिनच्या चूक लक्षात आली होती.

            तो म्हणाला,

            “ मला माफ कर यार. तुला बोलण्याची माझी फार ईच्छा होती. पण गावातील जातीभेदामुळे दुषीत झालेल्या वातावरणामुळे मी तुला बोलू शकलो नाही. आपल्याला लहाणपणी मैत्रीमध्ये जग दिसायचं. आता जात दिसते. सगळीकडे अशीच परिस्थती झाली आहे. आपण माणसं आहोत हेच आपण विसरलो आहोत.”

            वैभव म्हणाला,

            “ मी तुला चांगल्या प्रकारे ओळखतो. तू मुळात खूप चांगला आहेस. आपल्या गावातील लोकही चांगली आहेत. पण जातीवादाचा विचार त्यांच्या मनामध्ये घुसल्यामुळे सर्वांची मने कलुषीत झाली आहेत.”

            सचिन म्हणाला,

            “ आता आपल्या दोघांनाच गाव सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. कारण माझ्या जातीतील माणसं माझा मान ठेवतात. आणि तुझ्या जातीतील माणसं तुला मान देतात. त्यामुळे जातीभेद विसरुन चांगलं वागण्यासाठी ते आपले म्हणणे नक्की ऐकतील.”

            वैभव म्हणाला,

            “ विचार कर. आता आपण दोघे या बसमध्ये बसलो आहोत. बसमध्ये चढताना आपण चालकाचा चेहरा पाहिला नाही. किंवा त्याला त्याची जातही विचारली नाही. केवळ तो एक माणूस आहे. या विश्वासावर आपण बसमध्ये बिनधास्त बसलो आहोत.”

            सचिन म्हणाला,

            “ तुझं म्हणणं अगदी खरं आहे. पप्पांना मी हॉस्पीटलमध्ये ॲडमीट केले. त्यावेळी त्यांना रक्ताची आवश्यकता होती. त्यांना सलाईनद्वारे चढवलेलं रक्त कोणत्या जातीच्या माणसाचं आहे हे मी पाहिलं नाही. तसेच त्या डॉक्टरांचा चांगला गुण येतो. यामुळे मी त्या डॉक्टरकडे वडीलांना घेवून आलो. त्यावेळी मी त्यांची जात पाहिली नाही. आणि त्या डॉक्टरनेही आमची जात पाहून ईलाज केला नाही.”

            वैभव म्हणाला,

            “ आता बघ पाऊस चालू आहे. हा पाऊस सर्वांच्याच शेतात पडतो. तो जात पाहून पडत नाही. निसर्ग माणसामध्ये कधी भेदभाव करीत नाही. माणसंच माणसांमध्ये भेद करतात. एखादं लहान मूल एका जातीमध्ये जन्माला आले. आणि त्याला न सांगता त्याचे संगोपन लहाणपणापासून दुसऱ्या जातीतील घरामध्ये केले. तर त्याला त्याची जात कधीच कळणार नाही. माणसाच्या चेहऱ्यावर जात लिहिलेली नसते. माणसंच माणसाला जातीचा शिक्का मारतात.”

            आता रात्रीचे दहा वाजले होते. बस आनंदवाडी फाटयाजवळ येवून थांबली. आता पाऊसही थांबला होता. ते दोघे खाली उतरले. बस पुढे निघून गेली. त्या फाटयापासून आनंदवाडी गाव अर्धा किलोमीटर अंतरावर होते. नुकताच पाऊस पडून गेल्याने लाईटही गेली होती. सर्वत्र काळोख पसरला होता. आता तेथून दोघांनाही गावाकडे चालत जावं लागणार होतं. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात ते दोघे चालू लागले. चालत असताना ते एका शेतकऱ्याच्या कोटयाजवळ आले. त्याठिकाणी त्या शेकतकऱ्याने शिकारी जातीची तीन-चार कुत्री पाळलेली होती. ते दोघे त्या कोटयाजवळ येताच ती कुत्री दोघांच्याही अंगावर धावून आली. पण त्या दोघांनी सावध पवित्रा घेत हळूहळू तेथून पुढे चालण्यास सुरुवात केली. ती कुत्री बराच वेळ त्यांच्या पाठीमागे भुंकत चालत होती. आता आपण कोटयापासून दूर आलो आहोत ही बाब त्या कुत्र्यांच्या लक्षात आली. त्यामुळे ते परत आपल्या कोटयाकडे फिरले.

            सचिन म्हणाला,

            “ पाहिलंस. ती कुत्री आपल्या दोघांनाही भुंकली. ती आपल्याला जात पाहून भुंकली नाहीत. त्यांच्यासाठी आपली जात ही माणूस जातच आहे. निसर्गच नाही तर प्राणीही माणसाला माणूस म्हणूनच पाहतात. त्यामुळे ते आपल्यामध्ये भेदभाव करत नाहीत.”

            वैभव म्हणाला,

            “ ज्यावेळी माणसांवर काही संकट येते. नैसर्गीक आपत्ती येते. त्यावेळी माणसं जातीभेद सोडून एकत्र येतात. काही दिवसांपूर्वी कोरोना आला होता. त्यावेळी सर्वांना माणूसकीची किंमत कळाली होती.कोरोना गेला आणि परत माणसं माणुसकी विसरली. ”

            आता ते दोघे गावाजवळ आले होते. अचानक त्यांना लोकांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. ते दोघेही खूप भयभीत झाले. नक्कीच गावामध्ये काहीतरी अघटीत घटना घडली होती. बहुतेक लोक जातीवादांवरून एकमेकांशी भिडले असतील अशी शंका दोघांच्याही मनात उपस्थित झाली. आता नक्कीच गावामध्ये कत्तल घडणार हे नक्की होतं. ते दोघेही चिखलातून वाट काढत गावाकडे पळत सुटले. ते आता गावाजवळ आले. पाहतात तर काय ? नुकत्याच झालेल्या पावसामुळे नदीलापूर आला होता. आणि ते पुराचे पाणी गावामध्ये शिरले होते. गावाच्या पुढे असलेल्या बंदाऱ्यावर पुराच्या पाण्यात वाहून आलेली मोठी झाडे आणि गाळ अडकल्यामुळे पाणी पुढे न जाता गावामध्ये घुसले होते. गाव नदीपासून चढावर वसलेलं होतं. गावातील काही घरे उतारावर तर काही घरे चढावर होती. उतारावरच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे तेथील लोक चढावरच्या घरांमध्ये आली होती. त्यावेळी लोक जात पाहून घरांमध्ये घुसली नव्हती. आणि ज्या लोकांनी आश्रय दिला होता. त्यांनीही जात त्यांची जात पाहिली नव्हती. दिवस मावळता गावामध्ये पाणी घुसायला सुरुवात झाली होती. त्यामुळे उतारावरील लोकांना चढावर येता आले. चढावरील लोकांनीही त्यांना वर येण्यास मदत केली होती. पुराचे पाणी जर मध्यरात्री गावामध्ये शिरले असते. तर मात्र लोक झोपेत असल्याने बरीच जिवीतहानी झाली असती. पण सुदैवाने तसे झाले नव्हते.

            सचिन आणि वैभवने गावातील लोकांना विचारपूस केली. कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. सर्व जण सुरक्षीत होते. त्यामुळे त्यांच्या जीवात जीव आला. सचिनचे घर उतारावर होते. सचिनची बायको आपल्या मुलासह चढावर असलेल्या वैभवच्या घरी आली होती. वैभवच्या बायकोनेही तिला आणि तिच्या मुलाला मोठया आत्मीयतेने आश्रय आणि जेवण दिलं होतं.

            पुरामुळे गावावर संकट आलं होतं. आणि त्यामुळे जातीवाद विसरुन सगळा गाव आता गावावर आलेल्या संकटाशी लढण्यास एकत्र आला होता. गावातील लोक एकत्र आल्याचे पाहून सचिन व वैभव दोघेही मनोमन खुष झाले होते. आता ही एकी कायम ठेवायची. असा त्या दोघांनी आपल्या मनाशी पक्का निर्धार केला. काही दिवसांपासून गावातील लोकांची एकमेकांशी असलेली आपुलकीची नाळ तुटली होती. पण शेवटी निसर्गानेच तुटलेली माणुसकीची नाळ जोडली होती. जातीपेक्षा माणसं मोठी असतात ही शिकवण दिली होती.