काम सुरू होते तिथे आजू बाजुला धवडाचं काटं , मोंड्यांची खरी आणि बाणे , येरम यांच्या खरी होत्या. (खरी म्हणजे खोलगट कातळी भागात ४/५आंगूळे ते वीतभर उंच मातीची भर घालून केलेले शेत मळे) कवळाच्या भाऱ्यांची निर्गत लावायची जबाबदारी भाऊनी धाकू नी बाबल्या यांच्यावर सोपवली. चार दिवसानी रत्नागिरी गाठून त्यानी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याचे वर्दी दिली. साहेब त्यावेळी रजेवर होते. पण अव्वल कारकूनाने प्रोसिजर प्रमाणे विहीत नमुन्यात कम्प्लायन्स रिपोर्ट तयार करून त्यावर भाऊंच्या सह्या घेवून तो दाखल करून घेतला. प्रोसिजर प्रमाणे केलेल्या कामाची पाहाणे करून ते कंत्राटात दिलेल्या अटीशर्थी प्रमाणे झाले आहे की नाही याची पडताळणी करून त्याचा फेव्हरेबल व्हेरिफिकेशन रिपोर्ट आल्यावर पहिला हप्ता रिलीज होणार होता. मार्च एंडिंगला महिनाभर अवधी होता आणि सचिवालयातून शानू काका खोत यांचाही दट्ट्या होता. तसेच साहेबाच्या पर्सेण्टेजची रक्कम त्यातून वळती करायची बोली असल्यामुळे अधिक विलंब न होता , पहिला हप्ता मिळणार होता.
भाऊ कम्प्लायन्स रिपोर्ट देवून आल्यावर दहा दिवसात वर्दी आली. साहेब समक्षच व्हेरिफिकेशनला आलेले होते. साताठ लोकांच्या टीम साठी काजूगराची उसळ आणि सोलीव बटाटा भाजी , वरण ,आमटी, भात, पुऱ्या, डावीकडे लोणचं , मिर्ची, आंबेडाळ आणि बासुंदी असा जेवणाचा शाही बेत केलेला होता. लोकाना आराम करण्यासाठी सावलीची जागाधरून मांडव घातलेला होता. टीम आदल्या रात्री वसतीला राजापूरला डाक बंगल्यात मुक्कामाला थांबलेली होती. ठरलेल्या सकाळी अगदी लौकर मोजमापं घ्यायची कामं सुरू झाली. भाऊंचे सात गडी मदतीला आलेले होते. कामाला सुरवात झाली तेंव्हा आख़णी करताना बनवलेली मापाच्या काठ्यांचे तुकडे भाऊनी साहेबाना दाखवले. रस्त्याच्या रुंदीचे माप फूटभर सरसच आहे हे मोजून बघितल्यावर साहेबांची खात्री पटली होती. आलेल्या पैकी दोघेजण सोबत भाऊंचे चार गडी घेवून लांबी मोजायच्या कामाला लागले. दुसरी टीम घेवून स्वत: साहेब वीस पंचवीस कदम चालीच्या अंतरावर थांबून टेप टाकून रुंदी मापीत होते. अधून मधून गटारासाठी मारलेल्या चराची रुंदी नी खोली मोजीन बघितली जात होती. मध्येच रस्त्याची शार बांधलेली होती ती पिकावाचे टोक मारून तिथला दगड चाळवून कितपत मजबूत आहे याचीही पारख केली जात होती. चार पाच ठिकाणी स्वत: खात्री करून घेतल्यावर साहेबानी उरलेले काम सोबतच्या लोकांवर सोपवून ते मांडवात आराम करायला गेले.
साडेबारा वाजताच जेवणं आलेली होती. पण सगळं काम पुरतावल्यावर जेवण असं साहेब म्हणाले. सगळी मोजमापं घेवून तपासणी पुरी होईतो दोन वाजले.संपूर्ण भागात कुठेच चालढकल , त्रुटी आढळली नाही. साहेब खुश होवून म्हणाले, “जिल्हाभर इतके प्रोजेक्ट सुरू आहेत पण या प्रोजेक्ट एतकं बिनखोट काम कुठेच बघायला मिळालं नाही. आता आठदहा दिवसात तुम्हाला मोकळ करू.” हातपाय धुवून तोंडावर पाण्याचे हाबके मारून मंडळी जेवायला बसली. मांडवाच्या तीन्ही बाजुना मोठी झाडं असल्यामुळे उन्हाचा कडाका जाणवत नव्हता. साहेब लोकांची जेवणं झाल्यावर झटपट आवरून मंडळी उठली. अव्वल कारकूनाने मला बाजुला घेवून वीस मार्चच्या दरम्याने पेमेंट घ्यायला या म्हणून सांगितलं.कामात काहीच खोट नसल्यामुळे भाऊना काही काटछाट न होता संपूर्ण रक्कम मिळणार होती. मात्र त्यावेळी साहेबांचा हप्ता आधी पुरा करायचा होता. तशी तजवीज करायची सुचना त्यानी भाऊना दिली. भाऊना सरकारी कामांचा काहीच अनुभव नव्हता. आपलं पेमेंट मिळालं की मग त्यातून साहेबांच्या हप्त्याचे पैसे देवून व्यवहार पुरा करायचा असं त्याना वाटलं होतं. पण सरकारी अधिकारी सर्वप्रथम स्वत:ची सुरक्षितता पहात असतात. भाऊना हो नाही म्हणायची सवडच मिळाली नाही.
भाऊनी रस्त्याचं कंत्राट घेतलं त्या दरम्याने चिवारीतल्या दादा खोतांचा सचिवालयातला भाऊ शानुकाका गावी आले होते. त्यानी भाऊना भेटायला बोलावलं होतं. त्यावेळी त्यानी सरकारी कामाची पद्धत कशी काय असते त्याची कल्पना भाऊना दिली होती. मक्त्याप्रमाणे यच्चयावत सगळं काम पूर्ण होवून पुरी शहानिशा होईतो कंत्राटदाराला तांबडा पैसाही सरकारकडून सुटत नाही. भाऊंची आमदनी किती याची त्याना कल्पना होती. त्यानी कच खावू नये म्हणून कधी गरज पडली तर त्याला दोन चार हजाराची मदत करायला दादा खोताना सांगितलं होतं. भाऊना त्या गोष्टीची आठवण झाली. भाऊंची गरज तेवढीच होती. भाऊ दुसऱ्याच दिवशी दादा खोताना भेटायला गेले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मला जरा खाजगी विषय बोलायचा आहे असं भाऊनी सांगितल्यावर दादा खोत त्याना माडीवर घेवून गेले . संपूर्ण विषय ऐकून घेतल्यावर दादा खोत म्हणाले “ठीक ठीक , ह्या जगदुनियेचा काम करताहास तुमी. शानून आमच्या ह्या रस्त्यासाटी लय जिगजिग केल्यान पण कोण कंत्राटच घेवक् मागयना. तुमी जिद क्येलास म्हनान सगळ्यांची सोय होवची हा.... आमी तुमका मागे वडणार नाय......”म्हणत दादा उठले.
जानव्यात अडकवलेल्या चावीने कपाट उघडून दादा खोतानी तांबड्या आलवणात गूंडाळलेली लुकटी बाहेर काढली. आत शंभराच्या नोटांची पुडकी लोकरीच्या धाग्याने बांधलेली होती. त्यानी चार बंडलं काढून भाऊंच्या पुढ्यात टाकून , “धागो सोडून अवकासान नोटी नीट मोजून घी ” असं सांगून त्यानी लुकटी पुन्हा बांधली नी कपाटात ठेवून कुलुप घातलं. एवढी मोठी रक्कम भाऊनी हयातीत प्रथमच बघितली नी हातात घेतली होती. नोटा मोजताना त्यांचे हात थरथरत होते. दादा खोत केवढी मातब्बर असामी आहे याचं त्याना अजाप वाटलं. पैसे मोजून हात पिशवीत ठेवक्यावर भाऊ हात जोडीत म्हणाले, “माझा मझ्यावरच विश्वास बसत नाहिये.... इतक्या झतपट काम होईल अशी मी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती.” दादा फक्त हसले. नी म्हणाले, “ आता काम व्हयत् ह्येची तुमका कल्पना नवती म्हनान येकटे इलास तां ठीक हा पन खेच्याफुडे मोटी रक्कम आसताना वांगडान दोन गडी घेवन् फिरा. रत्नागिरीक जाशा तवा कोनतरी जानतो मानूस वांगडान ऱ्हवाने. तुमच्या साळेत बर्वे मास्तर हत ना ? तेंका नी एक गडी घेवन जाया. देन्या घेन्याचो विषय मास्तरांका साक्ष ठेवन् पुरो करा. आता दुकू आमच्या धकटू सडेकराक वांगडान धाडतय.....” माडीवरून खाली उतरल्यावर त्यानी धकटूला हाक मारली नी भाऊना पोह्यांसाठी दोन कुडू लाल दोडयचा भात काड नी तेंच्या वांगडा घरापावत जावन पोच करून ये. असं फर्मान सोडून दादा झोपाळ्यावर टेकले. (क्रमश:).