Seven miles four furlongs Road - 7 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 7

Featured Books
Categories
Share

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 7

  

 

आनी दुसरा म्हनशा तर  आवंदा जग दुनियेत  लय बागांची  कामा सुरू हायेत..... इतक्या सगल्यान्ला थोडाच गिराईक भेटनार हाय.....तिकडे  गडा पासून (विजयदुर्ग) देवगड कुनकेसूर पावत बागांची लय कामा चल्लेली आशेत.... तकडे  दो दोन वर्सा  खुटवळ पडून आशे. तेनला  गिराईक बी भेटतनाय.....  तुमचे कमीच तरी  वीसावर पाच लोड आशेत येवडा म्हाल उकलन्याची शामत  इकडच्या  भागात तरी कोन  येपारी माला दिसत नाय......तुमी इचार करा जुम्मादिन  झाल्यावर  मी  खेप करीन तवा  काय तां नक्की सांगा....” अशी भीती दाखवून इद्रूस  उठून गेला.

        ठोक व्यापाऱ्यांची  व्यवहार करायची  नीती आणि  बोलण्याची  ठराविक पद्धत होती. एकतर धंद्यात मुरलेले  व्यापारी सर्व सामान्याला  बेअक्कल समजून  त्याच्या मालाची जमेल तेवढी केंड करून त्याला बुचकळ्यात पाडीत. माल कमी असेल तर तीन चार लोड साठी इतक्या लांब कोणयेणार असं म्हणायचं..... मोठ्या प्रमाणात माल असेल तर हल्ली  मालाला उठाव नाही..... असं उलटं  तर्कट मांडायचं. मालक सहसा प्रत्यक्ष खेप घालून शहानिशा करीत नसे. कामदार जे सांगतील ते ही फार विश्वासाचं थोडच होतं? ह्याचा पुरेपूर फायदा व्यापारी घेत. इद्रूसने  लोचटपणा करीत तीन चार खेटे मारले. पण एकदाही चुकूनसुद्धा  त्याने दर मात्र फोडला नव्हता. कोळसा पडल्यावर उतारा किती पडतो त्यावर नंतर दर ठरवायचा हीच भाषा त्याने कायम ठेवलेली होती. पाऊस सुरू झाला  आणि पंधरवडा भराने  त्या गावाने नव्याने या धंद्यात  पडेले भुरटे व्यापारी भाऊंकडे खेटे मारायला लागले. अर्थात सगळ्यांनी थोड्याफार फरकाने अगदी  पडत्या दराने  आणि  दिवाळी नंतर हिशोब करायच्या बोलीवर  मागणी केलेली होती. त्या दरम्याने भाऊ  बाबुराव देसायाना भेटले. माल किती  काय याची चौकशी केल्यावर ते म्हणाले की, “इथला एकही व्यापारी रोखीने व्यवहार करणार नाही  आणि  वाजवी दरही देणार नाही. मी तुम्हाला  कोल्हापूर , सांगली  , साताऱ्या कडच्या काही  व्यापाऱ्यांची माहिती देतो. तुम्हीसमक्ष खेप करून भेटून या. तुम्हाला योग्य ट्रकवाले  तेच गाठून देतील. तुमचा माल  उचलायला सोपा आहे, जायला  सोईचा रस्ताआहे. . फक्त भरताड तुम्हाला करून द्यावी लागेल पण तुमचे बांधलेले गडी  आहेत.त्यामूळे काय वांधा नाय...... ”

             भाऊनी घरी आल्यावर  धाकू, बाबल्या यांना  बोलावून विचारलं. त्याना  खुटवळ भरायच्या कामाची माहिती होती. त्यांचीस्वत:ची  फैलं होती. गडी  मिळण्याचा सवालच नव्हता.  शेतीचा हंगाम असल्यामुळे लोड भरायचं काम संध्याकाळ नंतर केलं जायचं. भाऊंची स्वत:ची बत्ती असल्यामुळे तोही  प्रश्न नव्हता. मग भाऊ कोल्हापूर, सांगली, साताऱ्यापर्यंत  जावून वखारवाल्याना भेटून आले. साताऱ्यातला  बाबूराव  लोणारी माळ धारी  वारकरी भाऊना  विश्वासार्ह वाटला. कोकणातून आलेला व्यापारी  नी त्यात  जानव्यावाला ब्राह्मण म्हटल्यावर  बाबूराव लोणाऱ्याने  टाळी मारली. दीड हजार रुपये इसार घेवून ट्रक ठरवून दिवस मुक्रर करूनच भाऊ परत आले. ठरलेल्या दिवशी दुपारीच  ट्रकवाला  शामराव यड्रावकर उज्जू   येरमवाडीत आला. तो त्या भागात पूर्वी येवून गेलेला होता. भाऊनी ड्रायव्हर नी  त्याच्यादोन सोबत्याना जेवायला घातलं. गड्याना वर्दी गेली नी संध्याकाळी  वेळेवर जोतं सोडून रात्रीची  भाकरी चटणीची शिदोरी आणि उबवणासाठी घोंगडी घेवून   पस्तीस गडी आलेले होते. पहिलीच वेळ असल्यामुळे भाऊनी घरच्या देवाला नारळठेवला.  गावदेव आणि वेशीवरचं  देण भागवायला दोन नारळ सोबत घेतले आणि  ड्रायव्हर सकट आपला चौघांचा डबा घेवून भाऊही ट्रक भरणारांसोबत निघाले.

              नशिबाने  पावसाचं धुंदरूक नव्हतं.  दस्तुरी नाक्यावरून ट्रक  नव्याने बांधलेल्या रस्त्याला लागला. ड्रायव्हर माहितगार आणि  वहिवाटलेला  होता. “ ह्यो रस्ता आनी कवा झाला म्हनायचा?  कोन क्वाण्ट्रॅक्टर हाय म्हने? लय भारी  काम काम केल्यालं हाय की. ” हे ऐकल्यावर भाऊनी  आपणच हे काम केल्याचं सांगितलं.आता ड्रायव्हर भलताच चपापला. “ आरं  तिच्या...तुमीबी  राव भारी  मानूस निगालाय की.... दुपारधरनं  येवड्या गप्पा मारलो की , पत्त्याबी लागू देला न्हाय की तुमी  क्वाण्ट्रॅक्टर हायसाह्याचा. माला वाटलं काय की  तुमी  जळाव इकणारे येजण्ट  हायसा.... तुमी  मोटी असामी निगाला की राव.” थोड्याच वेळात ट्रक  खुटवळाच्या डेपोंजवळ पोचला. पाऊस पडून रस्त्यावर टाकलेली भर थोडी  ओलसरअसल्यामुळे  ट्रकची चाकोरी स्पष्ट उमटलेली दिसत होती. ट्रक वळवून घेतल्यावर  गडी झपाझप कामाला लागले. पाऊण  हौदा भरून झालातेंव्हा कामगार घामाने न्हाऊन निघालेले होते. नेहेमीच्या शिरस्त्या प्रमाणे  जरा विसावा इस्वाटा घेवून भाकरी खाल्ल्यावर  काम पुरं करायचं म्हणून गडीथांबले. डाव्या  अंगाला स्वच्छ पाण्याने भरून वहाणाऱ्या  खणीतून दोन कळशा भरूनआणल्या. व्हावटीत हातपाय धुवून घोंगडी अंथरून सगळे  जेवायला बसले.

               जेवण उरकल्यावर तासाभरात ट्रक लोड करून झाला. थपात अजून लाकडं शिल्लक होती. “ तेच्यो मारी मी  इद्रूसाच्या ......”  सणसणीत शिवी हासडीत बाबल्या पुढे म्हणाला, “ खुटवळाच्ये  डेपो ल्हान हत म्हणून  रड करीत हुतो भडवो... आता भेटॉने माका.... तेका बरोबर सुनावतय......  सगळे डेपो भरल्यार मुदलात आजून दोन तीन  लोड वाडतीच...... लय हरामी जात..... पंचवीशेक लोड होती  असां खोटा बोलोन भाऊंक मथवूक बगी हुतो...... ”  भाऊंसकट सगळेच हसले.शामराव म्हणाला, “आनकी चार रोजानी   दोन टरक घ्यून यायाचं काय..... थोडी जमात वाडवून देशिला काय लोड करून?” कामगारानी होकार भरलाआणि येत्या मंगळवारी  आपण दुसर्‍या टरकवाल्याला  डायरेक्ट  जाग्याला थांबवून तुमास्नी न्ह्यायला गावात येतो. असं सांगून उदबत्ती  लावून शामरावाने  ट्रकाचा स्टार्टर  मारला. गड्याना अटकळ नव्हती . भाऊनी लोड भरायच्या दराची चौकशी करून त्यावर पाच रुपये जादा रक्कम धाकूच्या हवाली केली. “आज भवानी हा म्हणून पाच रुपये जादादिलेहत. पन फुडच्या पावटाक येवडे देणार नाय. पन मजूरी ज्या त्या येळची ज्या त्यायेळी मिळात . माला ह्यो येवार लोळत ठेवायचे नाय. आनि येक  कोन इलो नी म्हाल उकललान ह्येची बोलवा फोडू नुको नी मी सवता येवार क्येलो ह्यातर अजिबात फोडू नुको..... कोणतरी राजापूरचो एजंटअसा सांगायचा.” मग  पाण्याच्या कळशा नी तांब्ये पुन्हाच्या खेपेला लागणार म्हणून तिथेच एका डेपोत ठेवून माणसं  मधल्या वाडीच्या घाटीने जायला निघाले.  भाऊनी रिस्टवॉच बघितलं .... फक्त नऊ वाजले होते. काम लौकर उरकलं होतं . (क्रमश:)