श्रद्धांजली in Marathi Short Stories by Trupti Deo books and stories PDF | श्रद्धांजली

Featured Books
Categories
Share

श्रद्धांजली

"श्रद्धांजली"

 "आमचं घर म्हणजे उत्साहाचं आणि माणुसकीचं गोकुळ होतं."
जिवंत अड्डाच होता. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आमच्या घरात एखादं रेडिओ सतत सुरू असावं, तसं तिचं बोलणं सुरू असायचं – माझी आजी.
जिवंत पुस्तकच होतं. प्रत्येक खोलीत, प्रत्येक भिंतीवर, आणि प्रत्येक वस्तूत तिची छाप होती — माझी आजी.

तिचं जगणं मात्र पूर्ण पोथीचं सार होतं. आणि जगण्याच अध्यात्मक होत.


तिचं खरं नाव लक्ष्मीबाई. पण आम्हा सगळ्यांसाठी ती फक्त "आई" होती. तिचं हसणं म्हणजे बहरलेल्या चाफ्याचा वास. आणि तिचं रागावणं? जणू एखाद्या झाडाला दम देणाऱ्या वाऱ्याचा झोंब.
ती होतीच अशी — कणखर, पण मऊ. शब्दांनी जरा खवखवीत, पण हृदय मात्र पुरणपोळीचं.

ती उठायची पहाटे पाचलाच. आणि दिनचर्या लवकरच चालू व्हायची आम्ही उठायच्या आत.कोपऱ्यातल्या देवळात निरांजन लावून ती म्हणायची, "देवा, माझ्या घरच्यांचं काही वाकडं नको होऊ दे रे!"
कधी वाटायचं — देवच तिच्यामुळे गप्प बसला असावा.

दिवस चालायचा तिच्या तालावर. तिच्या हातची पोळी, तिचा चहा, तिच्या कुशीतला दुपारीचा डुलका… हे सगळं आमचं 'सिस्टिम' होतं. संध्याकाळचीआणि दुपारची वेळ तिची खुर्चीत बसायची. शांतपणे बसली असायची. त्याच्यात कदाचित ती आपल्या आयुष्याचा मागोवा घेत असेल.


पण एक दिवस ती खुर्ची रिकामी झाली.



त्यादिवशी सकाळी ती उठलीच नाही. बाबांनी आवाज दिला. आईने तिच्या पायाला हात लावला, थंड वाटलं. आणि आम्ही… आम्ही गप्प झालो. त्या दिवशी घरात रेडिओही वाजला नाही, फक्त श्वास चालू होते.

त्या दिवशी समजलं — काही वेळा "शांतता" ही खूप आवाज करत असते.

ती गेली, आणि तिच्या पाठोपाठ कितीतरी गोष्टी गेल्या. देवळातला दररोजचा दिवा,घरातील काम करताना गुणगुणलेली ओवी, आणि ‘छोट्या गोष्टीत आनंद शोधा’ हा तिचा मंत्र.
पण ती तिची खुर्ची मात्र गेलेली नव्हती.

ती खुर्ची अजूनही तिथेच होती – रिकामी. पण प्रत्येक क्षणी भरलेली वाटायची… तिच्या अनुपस्थितीच्या अस्तित्वाने.आजी गेल्यानंतर तिच्या खोलीत शांतता पसरली.
एकदम ओबडधोबड शांतता.
पण तिच्या आठवणींनी ती खोली अजूनही बोलकीच आहे. खुर्चीच्या रूपात. कायम ती जवळच असल्याचा भास होतो.
.




आजी गेल्यानंतर काही आठवड्यांनी आईचं वागणं बदलायला लागलं.
ती शांत झाली. रागावणं कमी झालं. बोलणं संथ झालं.

एकदा संध्याकाळी मी पाहिलं — आई आजीच्या खुर्चीसमोर बसून तिच्या जुन्या कपाटातून एक पाकीट उघडून काही चिठ्ठ्या वाचत होती.
मी विचारलं, “आई, काय आहे त्या?”
ती म्हणाली, “तुझ्या आजीचे काही पत्रसदृश चिठ्ठ्या आहेत. तिनं तिचं मन कधीच उघडपणे बोलून दाखवलं नाही, पण लिहून ठेवलेलं दिसतंय.”

मी घेतली एक चिठ्ठी. त्यावर लिहिलं होतं:

"मी गेल्यावर कोणी त्या खुर्चीत बसेल का? की ती कायम माझ्यासाठीच राखून ठेवली जाईल? पण जर कोणी बसलं… तर त्याने त्या खुर्चीची 'जवाबदारी' घ्यावी — ती बोलत राहिली पाहिजे, आठवणी सांगत राहिल्या पाहिजेत…"



त्या ओळीने मला हादरवलं.

ती खुर्ची फक्त बसायची जागा नव्हती, ती आमचं घर चालवणारी "संस्कृती" होती.ती खुर्ची म्हणजे एक चालतंफिरतं स्मरणस्थान आहे.



आता वर्ष झालं.

आता आईच त्या खुर्चीत बसते. तिच्या हातात एक सुई-धागा असतो, आणि डोक्यावर गजरा.
ती आता आजीसारखं बोलते. तोंडात एखादं वाक्य, "आमच्या वेळेस..." असंच सुरू होतं.

कधी कधी ती माझ्या मुलीलाही गोष्टी सांगते.
"तुझ्या पणजीने तुला पाहिलं असतं ना, तर आनंदाने तुझ्यासाठी काय काय केलं असत!"

आणि आजही संध्याकाळी सहा वाजता त्या खुर्चीसमोरच्या 

तिच्या फोटो समोर एक दिवा लावला जातो.
आज्जी दिसत नाही, पण तिचं अस्तित्व सतत जाणवतं. त्या दिव्याच्या ज्योतीत, त्या खुर्चीच्या सावलीत… आणि आमच्या स्वभावातही.



त्या खुर्चीकडे बघताना आता असं वाटतं —
ती खुर्ची फक्त बसण्यासाठी नव्हती, ती साक्षीदार होती काळाची.

ती तिथेच आहे. एकामागोमाग एकजण तिला सोडून निघून जातात,
कोणाच्या आठवणी उरतात, कोणाचं वलय, कोणाचा उरलेला शब्द, कोणाची न संपलेली गोष्ट…

एक दिवस मी तिला मनात विचारलं –
"तू एवढं पाहिलंस, गमावलं, गिळून टाकलंस… कंटाळा नाही आला का तुला?"

ती शांत होती. पण मला तिचं उत्तर ऐकू आलं —
"इथे कोणी परमनंट नाही. सगळ्यांना यायचंच आहे… आणि सगळ्यांना जायचंच आहे.
मी फक्त बसणाऱ्यांना त्यांचं अस्तित्व आठवणीत रूपांतरित करून देते.
ज्याच्यावर बसलंय आयुष्यभर, त्याला शेवटी श्रद्धांजली मिळतेच.
माझं काम एवढंच – 'राहिलेल्यांना' त्याची जाणीव करून देणं."

मी तिच्या पुढे नमस्कार केला.
कधी नव्हे ते, एक रिकामी खुर्ची मला आयुष्याचं मोठं सत्य शिकवून गेली होती.


शेवटी फक्त एवढंच म्हणेन —
"जिवंत असताना जी आठवणीत घर करत जातात,
तेच निघून गेल्यावर खुर्ची मागे ठेवते – श्रद्धांजलीच्या रूपात."



श्रद्धांजली ही फक्त एक विधी नाही, ती एक कबुली आहे — त्या माणसाने आपल्या आयुष्यात दिलेल्या जागेची.

श्रद्धांजली म्हणजे फक्त हार, फोटो, आणि शांतता नाही... श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या गोड आठवणी जपणं आणि त्यांनी दिलेल्या चांगल्या परंपरांना पुढे नेत राहणं." तिचे सुसंस्कार जपण,

तिच्या जाण्याने काय गेलं, हे सांगणं सोपं आहे. पण तिच्या अस्तित्वाने आपल्यात काय शिल्लक ठेवलं… हे ओळखणं म्हणजे खरी श्रद्धांजली.

सौ तृप्ती देव 
भिलाई छत्तीसगड