कृतांत भाग २
गौरी आश्चर्यचकित होत राजकडे पाहू लागली. तिच्या कल्पनेप्रमाणे एवड्या भाषा शिकलेला माणूस साठ एक वर्षाचा केस पिकलेला म्हातारा असावा पण समोर तर नुकतीच मिसरूड फुटलेला तिच्याच वयाचा तरूण होता.
' मला वाटल कुणीतरी पत्रकार सांगाड्याच नेमक काय झाल त्याचा शोध घ्यायला आला असेल." गौरी म्हणाली.
" सांगाडे? कसले ?कुणाचे? म्हणजे मला सांगाड्यासोबत काम कराव लागणार?"
राज घाबरून म्हणाला.
" किती घाबरट आहेस तू! खरच तू प्राचिन लिपी वाचतोस? मला शंका आहे." गौरी त्याला हिणवत म्हणाली.
" हे बघा मी माझ काम कस करायच ते तुम्ही सांगू नका.
चला मला त्या वस्तू व लेख दाखवा."
" आत्ता? ताबोडतोब? जरा विश्रांती घे."
पण राज ऐकेना.अखेर गौरी त्याला घेवून आपल्या रूममध्ये गेली.ह्या बघ सार्या वस्तू इथेच ठेवल्यात."
राज त्या सार्या वस्तू न्याहाळू लागला. जुन्या वस्तू व लेख दिसले की राजला स्फूरण चढायचे. तो उत्सुक व्हायचा. त्यांचा छडा लावेपर्यंत त्याला धड झोप यायची नाही.
" मी आताच माझ्या कामाला सुरूवात करतो."
"इथ ? माझ्या राहूटीत! अजिबात नको.मी सरांना सांगून दुसर्या राहूटीत तूझी सोय करते."
" मला घाबरता?" राजने हसत विचारले.
"मी झुरळांना घाबरत नाही." ती रागाने म्हणाली.
व डाॅ गोपाल शर्मांना सांगण्यासाठी बाहेर गेली.
गौरी डाॅ. शर्मांकडे गेली.डाॅ. शर्मा राहूटीत चिंताग्रस्त होऊन बसले होते. मौर्ये गोदामाच्या रखवालदाराला डाॅ.कडे घेऊन गेले होते.त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला असे डाॅक्टरनी सांगितले.त्याच्यावर उपचारही सुरू केले होते.
" सर, राजसरदेसाई आलाय.त्याने काम सुरू केलय."
" त्याने काय होईल?" डाॅ. वैतागून म्हणाले.
" काहीतरी मार्ग सापडेल.त्याला एक स्वतंत्र राहूटी द्यावी लागेल. "
" ठिक आहे.त्याला गोदामाच्या बाजूची छोटी राहूटी दे.
मी दुपारी भेटतो त्याला."
" ठिक आहे सर."
" मला वाटत आपण आपल काम चालू ठेवूया. पोलीसांना
घडलेल्या घटनेची माहिती सांगूया. उद्या काही गोंधळ होवू नये...यासाठी आपल्याला तक्रार द्यावी लागेल."
एवड्यात मोबाईलवर बातम्या बघत असलेली गौरी आश्चर्याने ओरडली...
"सर एक विलक्षण बातमी वारंवार येतेय. "
"काय झाल?" डाॅ गोपाल शर्मा यांनी विचारले.
" इथून जवळ असलेल्या हायवेवर रात्री एक प्रायव्हेट बस अनाकलनीय रित्या बंद पडली.त्यात एकून अठ्ठाविस लोक होते.गाडी का बंद पडली हे ड्रायव्हर बघत असताना काही पुरूष बसमधून खाली उतरले.पण त्यापैकी दहाजण
गायब झाले. ते कुठे गेले ते कुणालाच कळल नाही. जवळचे जंगल धुंडाळूनसुध्दा कोणच सापडले नाही. पोलीसही चक्रावले आहेत."
डॉ. शर्मा काहीवेळ गप्प राहिले. इथून दहा सांगाडे गायब झाले त्यानंतर दहा प्रवाशी नाहिसे झाले या दोन घटनेंचा एकमेकाशी काही संबध तर नाही ना अस क्षणभर त्यांना वाटल.छे ! ह्या दोन घटनांचा एकमेक काहीही संबध नाही हेच खर.त्यांनी डोक झटकल.ते उठले.
" चल , साईटवर जावूया."
दोघही साईटकडे निघाले एवड्यात राज घाईघाईत तिथे आला.
" आल आता हे ध्यान! आता हा काय नवीन सांगणार कुणास ठाऊक. " गौरी वैतागली.
" कोण आल?" डाॅ. शर्मांनी विचारले.
" राज सरदेसाई, प्राचीन लिपी जाणकार... याच्या हातून काही होईल अस वाटत नाही. "
" तुम्ही डाॅ गोपाल शर्मा ?"
"होय."
" सर, हे काहीतरी भयानक प्रकरण आहे.पंधराव्या शतकातल्या आयुष वर्मन व अधोरपंथीयांच्या संघर्षाचे. ह्या मॅडम कुठच्यातरी सांगाड्याविषयी बोलत होत्या ;मला सांगा ते सांगाडे कुठे आहेत?"
" सांगाडे...." गौरी बोलता-बोलता थबकली.
" ते सांगाडे नाहिसे झालेत. कुणीतरी ते पळवलेत."
डाॅ.गोपाल शर्मा म्हणाले.
" पळवले? " राज सरदेसाई आश्चर्याने म्हणाला.
एवड्यात हाॅस्पीटलमध्ये गेलेले डाॅ. मौर्ये आले.ते खुपच घाबरलेले दिसत होते.ते सरळ धावतच डाॅ. गोपाल शर्मांकडे आले.
" सर,...स...र.." त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.
" मौर्ये...शांत व्हा..!" डाॅ गोपाल शर्मा म्हणाले.
गौरीने त्यांना थर्मासमधले पाणी दिलं. थोड शांत झाल्यावर ते म्हणाले...
" सर..सांगाडे....पळवले नाहित तर चालत गेले."
"काय?" सगळे एकदमच ओरडले.
" होय...रखवालदार शुध्दीत आल्यावर वारंवार हेच सांगत होता. दरवाजाचे कुलूप आपोआप उडाले व दरवाजातून एकून दहा सांगाडे चालत बाहेर आले हे बघून तो बेशुद्ध पडला."
" मौर्ये, आपण शिकलेले आहोत अश्या भाकड कथांवर विश्वास ठेवायचा नसतो. तो योजनाबध्ध रीतीने केलेला प्रसंग असेल...जेणेकरून आपल काम बंद पडेल."
" मलाही तसच वाटत इथ रिफायनरी होण्यात अनेकांचा
फायदा आहे त्यांनीच हे घडवलेल असणार." गौरी दुजोरा देत म्हणाली.
" नाही रखवालदाराने बघितलय ते खरही असेल मी वाचलेल लिखाण तेच सांगतय. काहीतरी मोठ अघटित घडणार आहे.हे नक्की!" राज म्हणाला.
" ये. ..गप्प...!उगाच काहीतरी बरळू नकोस." गौरीने राजला फटकारले.
" मी आज हे सगळं लिखाण वाचतो त्याच भाषांतर करतो. रात्री मी ते तुमच्या समोर ठेवतो.मग ठरवा काय ते." राज म्हणाला.
गौरीने त्याच्याकडे रागाने बघितले.
"पण हे सार काम तुझ्या राहूटीत करायच, समजल !"
" होय मलाही झुराळांसोबत राहायची हौस नाहीय. "
राज वैतागून म्हणाला.
राज परत गौरीच्या राहूटीत गेला.पंधरा-विस मिनिटात त्याने आपले सगळे सामान नव्या ठिकाणी हलवले
व तो आपल्या कामात गढून गेला.
त्याने सुरूवातीला कमलपत्रांवर लिहिलेल्या लिखाणावर लक्ष केंद्रित केल. हि कमलपत्रे एका तांब्याच्या पत्र्याच्या चौकोनी पेटित व्यवस्थित ठेवलेली होती. बहिर्गोलभिंग,
कच्च्या लिखाणासाठी कागद , लॅपटॉप यासगळ्या साहित्यानिशी तो मनापासून काम करू लागला.त्या अगम्य लिपीतल्या एका एका अक्षराशी झुंजू लागला. पहिल्या कमलपत्रांवरचा मजकूर त्याला काही प्रमाणात आकलन झाला.त्यात सुयश या तरूणाच्या मैत्रेय या संघटनेची सुरूवात कशी झाली. ..याची माहिती होती.
ते लिखाण वाचत असताना त्याच्या अंगावर शहारा उठले.तो जे वाचत होता ते आपण कुठेतरी अनुभवलय...जगलोय अस त्याला वाटल.एक वेगळी जाणीव ..वेगळी अनुभूती त्याला येवू लागली.हे काय आहे ? का वाटतय यात आपला सहभाग आहे .साडे चारशे वर्षांपूर्वी घडलाल्या घटनांशी आपला काय संबध?
राजची उत्सुकता वाढली. सगळ्या लिखाणाचा अर्थ लावल्याशिवाय काहिच कळणार नव्हते. ही कहाणी नव्हे..! इतिहास होता. अघोरींविरूध्द दिलेल्या यशस्वी लढ्याचा तो इतिहास होता...अस पहिल्याच पानावर स्पष्टपणे म्हटले होते.
राज हे वाचत असताना.....मध्यप्रदेश व महाराष्ट्र यांना जोडणार्या हायवेवर दहा भगवे वस्रधारी साधू झपाझप चालत होते.त्यांच्या डोळ्यात साधूसारखी दया....सहजता व प्रसन्नता दिसत नव्हती तर त्या ठिकाणी क्रूरता...छध्मीपणा...आसूरी वृत्ती दिसत होती.त्यांच्या पैकी एक गलेलठ्ठ साधू थोडा सावकाश चालला होता.
" कृतांता....लवकर पाऊल उचल आपल्याला अजून बराच टप्पा गाठायचा आहे." त्यांचा म्होरक्यां म्हणाला.
" हंहं...हं" तो गलेलठ्ठ साधू फिसकारला.
" तूला तूझी ताकद दाखवण्याची....लूटालूट....रक्तपात करण्याची संधी लवकरच मिळेल.पण त्यासाठी आपल्याला लवकर...इथून निघायचय.घाई कर."
म्होरक्यां म्हणाला.
--------*--------*--------*-------*--------
त्या राहुटीत राज एका खुर्चीवर बसला होता समोर टेबलवर
उत्खननात सापडलेल्या वस्तू ठेवल्या होत्या. त्याशिवाय एक डायरी होती ज्यात राजने काही नोंदी केल्या होत्या...व काही आकृत्या रेखाटल्या होत्या.एक सौम्य प्रकाश देणारा सोलार कंदील तिथे होता.तो शर्मा....मोर्यै व गौरीची वाट बघत होता.कमलदलावरची माहिती वाचल्यावर त्याला जे उमगले होते ते रंजक होतेच पण भयावह पण होत. त्याच्या आकलनानुसार जर घडत गेले तर सगळा समाज संकटात होता. राज डोळे मिटून विचार करत होता. चाहूल लागली तेव्हा त्याने डोळे उघडले. समोर गौरी व मौर्ये उभे होते.
" शर्मा सर नाही आले?"
" ते मुख्यालयात गेलेत.तिथून फोन आला होता." मौर्ये म्हणाले.
" बसा."
" काय ते लवकर सांग. आम्ही बसायला नाही आलोत." गौरी म्हणाली.
राज हसला व म्हणाला.....
" ऐका, पंधराव्या शतकात इथे एक साम्राज्य होत.त्याला वर्मण साम्राज्य म्हणत.हे साम्राज्य अजिंक्यवर्मण याने स्थापन केले होते.तो खूप पराक्रमी, धार्मिक व न्यायप्रिय होता.साम्राज्य अतिशय शक्तिशाली व वैभवशाली होते..त्याला सुमारे दिडशे वर्षांची परंपरा होती. पण हे साम्राज्य भ्रष्टाचार....अधर्.. कट कारस्थाने...व्यभिचार याने पोखरले होते .तांत्रिक व अघोरी यांनी अप्रत्यक्षरित्या कारभार हाती घेतला होता.राज्यात खुलेआम अघोरी तंत्रसाधना व पूजा होत.माणसांचे बळी दिले जात. साधनेसाठी स्मशानातली प्रेते पळवली जात.गावागावात ग्रामदैवतेची मंदिरे जबरदस्तीने बंद केली होती.खुद्द सम्राट अजितवर्मन ,प्रधान प्रयागराज व सेनापती रुद्रराज या तंत्रसाधनेत सहभागी होत.सारेच भोगविलासात दंग होते.
सारी प्रजा त्रस्त झाली होती.या तांत्रिकांचा म्होरक्या होता... आचार्य अग्निधर.त्याने अनेक सिध्दी प्राप्त करून घेतल्या होत्या.सारे वाक्य त्याचा शब्द मानत .त्यांची आज्ञा पाळत
राजा व त्याचा दरबार अग्निधराच्या आहारी गेला होता.
आयुष नावाचा तरुण हे सगळे बघून पेटून उठला होता.त्याने मैत्रेय नावाची एक संघटना तयार केली.यासाठी त्याला मदत केली ती रघुराजमुनींनी. मैत्रेय संघटना दोन स्तरांवर काम करत होती.मैत्रेय लोकांना भक्तीमार्ग कसा महत्वाचा आहे ते समजावत असतं.त्याचवेळी शाक्तांचा नायनाट कसा करता येईल ते पाहत होते.अश्यावेळी राजाचा भाऊ उदयवर्मन राज्य बळकावण्याचा प्रयत्न करत होता.काही सरदार व सेनापती रूद्रराज यांना त्याने आपल्या बाजूने वळवले होते.राणी रत्नमाला व तिचा भाऊ विलासराव हे राज्यकारभार आपल्या हाती ठेवण्यासाठी झटत होते.थोडक्यात राजा अजित वर्णन हा सगळ्यांच्या हातातलं बाहुली बनला होता.साम्राज्यात बेदिली माजली होती.
एवढे बोलून राज सरदेसाई थांबला.
" पुढे काय घडलं?" गौरीने विचारले. तिची उत्सुकता खूपच वाढली होती. गोष्ट ऐकून मौर्ये सुध्दा प्रभावित झाले होते.आपण जिथे बसलो आहोत तिथे पूर्वी एक संपन्न साम्राज्य होते.या जाणिवेने ते थरारले होते.
" इथे राजकन्या गौरीवर्मनचा उल्लेख येतोय." राज हसत म्हणाला.
" एक बेफिकीर....उद्दाम...प्रजेला कस्पटासमान मानणारी राजकन्या या कथेत प्रवेश करताना दिसते."
" तू हे मुद्दाम..सांगतोस...तिचं नाव गौरी कसं असेल?" गौरी रागाने म्हणाली.
" मी माझ्या पदरच सांगत नाही.हा इतिहास आहे." राज हसत म्हणाला.
" पण तिची कहाणी खूपच मनोरंजक व आश्चर्यकारक आहे."
राज पुढे बोलणार तेवढ्यात शर्मा सर घाईघाईत राहुटीत आले.
" अघटित घडलंय बरं का. आत्ताच एका आमदारांचे अपहरण झालेय.त्या आमदारांच्या कार्यालयात सायंकाळी दहा साधू आले होते.आमदारांना त्यांनी एक तांत्रिक साधना करायला सांगितली.
त्या प्रमाणे सगळी तयारी करुन साधना सुरु केली.त्यानंतर त्या तांत्रिकांनी सर्वांना बाहेर जायला सांगितले.आत पुन्हा मंत्रघोष सुरू झाला पण थोड्याच वेळात सारं शांत झालं.सर्वांना वाटलं साधना संपली पण बराच वेळ कोणीच बाहेर येईना म्हणून कार्यकर्ते दरवाजा तोडून आत घुसले पण आत कुणीही नव्हते.
बंद खोलीतून ते साधू व आमदार गायब झाले होते." शर्मांनी सांगितले.
" हे असंच आता घडत राहिल.घात- अपघात,अपहरणे,दंगे,
दंगली होत राहतील.ते मोकळे झालेत.चारशे वर्षांपूर्वी जे आयुषमुळे साध्य झाले नव्हते ते आता ते करतील. हो चक्रधर पुन्हा आलात आणि आता सोबत आहे अफाट ताकदीचा..
अचाट सामर्थ्य असलेला अर्धा जीवंत व अर्धा मृत ' कृतांत'!"
राज विचार करत म्हणाला.
" हा वेडा झालाय . काहीही बरळतोय." गौरी वैतागून म्हणाली.
" दहा सांगाडे.. स्वतः चालत गायब झाले. बस मधले दहा पुरुष गायब झाले.आमदारांकडे दहा साधू आले होते.याची एकमेकांशी संगती जुळते आहे.या कमलपत्रांवर हेच लिहिले आहे.आपला देश
या क्षणी संकटात आहे." राज म्हणाला.
" ते राहू दे. गौरी वर्मन व मैत्रेय यांच पुढे काय झाले ते सांग?" मौर्ये
म्हणाले.
" हो ते समजलं तरच आपण पुढे यावर उपाय शोधून काढू शकतो.खर तर चारशे वर्षांपूर्वींचा ही कहाणी व्यवस्थित मैत्रयांनी लिहिली आहे .मी ती पुढे वाचूनच दाखवतो."
राज हाती ती कमलपत्रे घेत म्हणाला.
------********--------*******-------********----*******------
भाग २ समाप्त