तीन झुंजार सुना
श्रेय
मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर
लेखनास सहाय्य डॉ. अनंत बिजवे
Adv. आनंद मुजुमदार.
पात्र रचना
श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
कमला बाई श्रीपत रावांची बायको
प्रताप श्रीपत रावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपत रावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपत रावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपत रावांची मुलगी
सरिता प्रताप ची बायको.
वर्षा निशांत ची बायको
विदिशा विशाल ची बायको.
वासुदेव राव सुळे वर्षा चे वडील
विजया बाई वर्षांची आई.
शिवाजी राव विदिशा चे वडील
वसुंधरा बाई विदिशा ची आई
आश्विन प्रताप आणि सरिताचा मुलगा
रावबाजी ठेकेदार. बटाईदार.
भाग १०
भाग ९ वरून पुढे वाचा .................
निशांत आणि विशाल गेल्यावर सरिता म्हणाली
“वर्षा, माझ्या बरोबरीने शेतात काम कराल, असं नको होतं तू म्हणायला. आता घरी गेल्यावर तुमचं काही खरं नाही”
“खूप फसफसणार आहेत दोघं जणं, पण तू नको काळजी करू. We will manage. पण तू ठाम नकार दिलास ते मात्र बरं झालं. बाबा, येतो आम्ही.” – वर्षा.
“जा, लवकर पळा, ते दोघं थांबले आहेत तुमच्या साठी. तशीच काही जरूर वाटली तर फोन कर ग.” सरिता म्हणाली.
घरी गेल्यावर, निशांत आणि विशाल काही बोलण्याच्या मूड मध्ये नव्हते. वर्षा आणि विदिशा दोघी चूप चाप रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागल्या.
त्यांचा स्वयंपाक होत आला असतांना निशांत ओरडून म्हणाला
आम्हाला जेवायचं नाहीये.
विदिशा बाहेर आली. निशांत एकटाच बसला होता. विशाल खोलीत होता. ती खोलीत गेली.
“विशाल काय झालं ? जेवायचं नाहीये का ?”
“नाही.” विशालचं एकदम तुटक उत्तर.
“अरे, जरा सबुरीने घ्या. त्यांना विश्वासात घेऊन पावलं उचलली असतीस तर ही वेळ आली नसती.” – विदिशा समजावणीच्या सुरात बोलली.
“कोणाला विचारायचं ? बाबांना की वहिनींना ?” विशाल अजून रागातच होता.
“हे बघ, बाबांचं आता वय झालंय आणि ते काही आता शेतीत लक्ष घालणार नाहीयेत. जर त्यांना खात्री पटली की तुमच्या कडून प्रताप दादांसारखी सारखी शेती होणार नाही, तर ते कसायला द्यायला नाही म्हणणार नाही. तुम्ही फक्त हे पटवून द्या की वहिनीची तुम्ही पूर्ण काळजी घ्याल म्हणून. थोडा वेळ जरूर लागेल पण तुमच्या मनासारखे नक्कीच होईल.” विदिशा म्हणाली.
“तुला वाटतं, खरंच असं होईल म्हणून ?” – विशाल.
“खात्रीने. मलाच काय पण वर्षाला पण असंच वाटतंय. विशाल, ९० टक्के कामं प्रेमानेच होतात. धिसाडघाई करून सगळं चुकतच जातं. बघ, थोडा वेळ घ्या, विचार करायला. पण आत्ता जेवायला चला. अन्नावर राग काढून काहीही साध्य होणार नाहीये.” – विदिशा.
निदान त्या वेळे पुरते तरी दोघं शांत झाले. आणि पानावर बसले.
रात्री जेवतांना बाबा सरिताला म्हणाले “तुला शेतीच्या कामाचा काहीच अनुभव नसतांना सुद्धा एकदम २० लाखांची ऑफर कशी काय दिलीस ? काय आहे तुझ्या मनात ? आज तर ते तयार नव्हते पण उद्या हो म्हणाले, तर काही विचार करून ठेवला आहेस का ?” बाबांनी विचारलं.
“बाबा, इतकी वर्ष तुम्ही आणि हे शेत सांभाळत होते आणि मी सर्व पहात होते. काय कठीण आहे २० लाख देणं ?” – सरिता.
“अजिबात कठीण नाहीये. आणि हे त्यांनाही माहीत आहे. तरी सुद्धा ते २० लाखांना आपलं शेत बटाई वर का देताहेत ते कळत नाही. पण तू हे आव्हान पेलू शकशील याची तुला खात्री आहे ?” – बाबांनी शंका काढली.
“तुम्ही माझ्या बरोबर असतांना शंका कसली असायची ? तुमच्या मार्गदर्शनाखाली मी काम करेन. वर, माझ्या पण काही कल्पना आहेत त्या पण प्रत्यक्षात उतरवता येतील. मी तर म्हणते त्यांनी हो म्हणावच. मला कॉन्फिडंस आहे.” – सरिता.
“ठीक आहे. पण सरिता, माझी तब्येत आताशा मुळीच ठीक नसते. अशात मी तुला फारशी काही मदत करू शकेन असं वाटत नाही. तू एवढी मोठी उडी घ्यायचा विचार करते आहेस, चांगली गोष्ट आहे, पण जरा जपून. माझी भूमिका फक्त ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ एवढीच असणार आहे. त्यातून मला या दोघांचा काही भरवसा वाटत नाहीये.” बाबांनी सरीताला सावध केलं.
“बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. मला खात्री आहे की मी हे करू शकेन म्हणून. थोड्या चुका होतील, त्रासही होईल पण सांभाळीन मी. तुम्ही निश्चिंत रहा.” – सरिता.
तिकडे दिवसभर विचार विनिमय करतांना, वर्षा म्हणाली की
“निशांत, आम्ही दोघींनी पण बराच विचार केला. आम्हाला दोन मार्ग सुचवावेसे वाटताहेत ऐकून घेणार का ?”
“सांग. तुम्ही सुद्धा बोलून घ्या.” – निशांत.
अरे तसं नाही. जरा ऐकून तर घ्या. नाही पटलं तर, तुम्हाला जसं वाटेल तसं करा. आमचं काही म्हणण नाही.” वर्षा सामोपचाराने म्हणाली.
“ओके. बोला.” – निशांत.
“पहिला मार्ग म्हणजे आपण वहिनींना एक वर्षांच्या बोली वर, त्या म्हणताहेत तसं शेत कसायला देऊ. जर समाधानकारक उत्पन्न नाही मिळालं तर दुसऱ्या वर्षी, बटाई ने दुसऱ्याला देऊ. आणि हे त्यांच्या कडून कबूल करून घेऊ. भांडा भांडी पण होणार नाही. एक वर्षा नंतर आपण मोकळे, आणि तुम्हीच दोघं सर्वे सर्वा.” वर्षा म्हणाली.
दूसरा मार्ग ?
“तीन वाटे करायचे. त्यांच्या १० एकरात त्यांना जशी शेती करायची असेल तशी करू द्या. उर्वरित २० एकर तुम्ही कसायला द्या. आणि एंजॉय करा.
पण मला वाटतं की पहिला मार्ग जास्त सोपा आहे. एक वर्षा नंतर कंट्रोल तुमच्या हातात येणार आहे. आणि तो ही संपूर्ण शेतीचा. एक वर्ष पाहता पाहता निघून जाईल. आज वहिनींना शेतीबद्दल कसलाच अनुभव तर सोडाच, साधी माहिती सुद्धा नाहीये. सर्व गोष्टींची माहिती करून घेऊन प्रयोग करता, करता एक वर्ष तसंच निघून जाईल. आणि त्यांना काही साधलं नाही, हे ठरल्यावर, तुमचा मार्ग मोकळा होईल. संपूर्ण शेतीचा ताबा तुम्हालाच मिळेल. पहा विचार करून.” – वर्षा.
दोघांनाही थोडा विचार केल्यावर पहिला मार्ग पटला.
“पण तुम्ही दोघी वहिनींना मदत करायला जाणार म्हणत होत्या त्याचं काय ?” – विशाल.
“आम्ही जाणार आहोत, ते वहिनींवर लक्ष्य ठेवण्यासाठी, आम्ही त्यांच्या गुड बुक्स मधे असल्याने, त्या विश्वासाने आमच्या पासून काही लपवून ठेवणार नाहीत. आम्ही तिथे असल्याने प्रत्येक गोष्टीची आम्हाला माहिती होईल. म्हणजे त्या काही गडबड करण्याचा प्रश्नच येणार नाही. तुम्हालाही रोजच्या रोज अपडेट मिळत राहील.” – विदिशा.
“वा. बायका शोभतां तुम्ही आमच्या. असंच करू या मग. काय विशाल ?” – निशांत.
विशाल नी पण संमती दिली. “बरय, तसही आपल्याला शेतीची कटकट नकोच होती. पैसे पूर्ण द्या म्हणजे झालं.” विशाल पुढे म्हणाला, “निशांत, पण मला असं वाटतंय की जर आपण पूर्ण शेती वहिनीच्या हातात सोपवली, आणि तिला नाही झेपलं, आणि शक्यता याचीच जास्त आहे, तर त्या परिस्थितीत खर्चाची सगळीच जबाबदारी आपल्यावर पडेल आणि मग मुष्कील होऊन जाईल.”
“हं. तू म्हणतोस त्यात तथ्य आहे. मग आता तुझा काय विचार आहे ?” – निशांत.
“मी काय म्हणतो की आपण वहिनीला सांगू की ट्रायल बेसिस वर 5 एकरांचं शेत कसून पहा. जर जमलं तर पुढच्या वर्ष पूर्ण शेती घे कसायला. या वर्षी आपण 25 एकर बटाई ने देवू. म्हणजे पैशांची चण चण भासणार नाही. आणि जर तिला नाही जमलं तर याच माणसाला पूर्ण शेती देवू. कसं वाटतंय ?” – विशाल.
“परफेक्ट.” निशांत उद्गारला. मग वर्षा आणि विदिशा कडे पाहून त्यांना विचारलं की “तुमचं काय मत आहे यावर ?”
त्यांना पण ही कल्पना पटली. त्यांनी पण संमती दर्शक मान डोलावली.
मग संध्याकाळी चौघे जण शेतावरच्या घरी गेले.
बाबा आणि आई समोरच झोपाळ्यावर बसले होते आणि सरिता किचन मध्ये होती.
“या. त्या आतल्या खुर्च्या घ्या. अंगणातच बसू. छान गारवा आहे इथे.” – बाबा.
“हं, काय म्हणता ?” – बाबा
“आम्ही विचार करत होतो की, काल वाहिनी जे बोलली, ते कशाच्या जोरावर ?” – निशांत.
“बटाई मान्य नाही ते ?” – बाबा.
“नाही, शेत कसायला घेते, असं म्हणाली ते” – निशांत..
“ते तिलाच विचारा, तुम्ही अचानकच आलात. आमचं काही बोलणंच झालं नव्हतं या बाबतीत. हवं तर तुमच्या बायकांना विचारा. त्या इथेच होत्या. आश्विन, आईला बोलाव जरा. सांग काका काकू आले आहेत म्हणून.” बाबा म्हणाले.
आश्विननी आईला बोलावून आणलं.
“अरे वा, थांबा चहा टाकते तुमच्या साठी.” सरिता म्हणाली, आणि ती वळली.
चहा आणल्यावर गोष्टी सुरू झाल्या.
निशांत नी सरळ विषयालाच हात घातला.
“वहिनी, काल तू शेत कसायचा चॅलेंज घेतला तो कशाच्या जोरावर ?”
“निशांत, प्रश्न तो नाहीच आहे. प्रश्न हा आहे की तुम्हाला 20 लाख वर्षाला हवे आहेत. का ? आणि ते मी दिले तर चालणार आहेत का ?” – सरिता म्हणाली.
“वहिनी, म्हणजे तू या मुद्द्यावर अजूनही ठाम आहेस ?” – निशांत.
“हो.” सरितानी उत्तर दिलं.
“हा एवढा आत्मविश्वास कुठून आला ? मधे तुझा भाऊ आला होता त्यानेच तुला काही कानमंत्र दिला का ? तो याच्याच करता आला होता का ?”- निशांत.
सरिता, निशांतचा प्रश्न ऐकून हतबुद्ध झाली. वर्षा आणि विदिशा सुद्धा विचारात पडल्या. निशांतनी हे काय मध्येच उपटून काढलं असाच भाव दोघींच्या चेहऱ्यावर होता. सरीता काही बोलण्याच्या आतच निशांत पुन्हा म्हणाला
“तरी मला वाटलच होतं, की कुठेतरी पाणी मुरतंय, उगाच नाही अचानक त्याला बहिणीचा पुळका आला. तुझ्या मदतीला येतोय असं भासवून, शेती गिळंकृत करायचा डाव आहे का त्याचा ? पण वहिनी, निक्षून सांगतोय मी, हे होऊ देणार नाही, सांगून ठेवतो.”
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा.
https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187
धन्यवाद