तीन झुंजार सुना
श्रेय
मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर
लेखनास सहाय्य डॉ. अनंत बिजवे
Adv. आनंद मुजुमदार.
पात्र रचना
श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
यमुनाबाई. श्रीपतरावांची बायको
प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपतरावांची मुलगी
सरिता प्रतापची बायको.
वर्षा निशांतची बायको
विदिशा विशालची बायको.
वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील
विजयाबाई वर्षांची आई.
शिवाजीराव विदिशाचे वडील
वसुंधराबाई विदिशाची आई
आश्विन प्रताप आणि सरिताचा मुलगा
बालाजी आणि सदा शेत मजूर
बारीकराव शेत मजूर
कृष्णा आणि राघू शेत मजूर
दाजी, रखमा आणि सुरेश गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.
रावबाजी ठेकेदार. बटाईदार.
रघुवीर आणि त्यांची गॅंग परदेशी मजूर.
रामशरण रघुवीरच्या गॅंग मधला मजूर
भाग २७
भाग २६ वरून पुढे वाचा .................
सगळं ऐकल्यावर निशांत म्हणाला “आम्ही कोणी, कोणी काय काम करायचं ते कळलं, पण वहिनी, तुझं काम काय याबद्दल काहीच बोलली नाहीस, हे कसं ?”
“अगदी करेक्ट बोललास निशांत तू. ही सगळी कामं वेळच्यावेळी होतात की नाही हे मी बघणार आहे. कुठलीही अडचण आली तर मलाच धावावं लागणार आहे. त्यामुळे मी सगळ्याच विभागात असणार आहे. मजुरांचा विभागही मीच सांभाळणार आहे, आणि गौ शाळा पण मीच बघणार आहे. आपण ५ एकरात भृंगराज पेरणार आहोत, आणि एका एकरात गूग्गूळ, ती सर्व जबाबदारी माझीच असणार आहे. ही दोन्ही कामं नवीन आहेत, त्यामुळे त्यातही मला जवळ जवळ, पूर्ण वेळ लक्ष घालावं लागणार आहे. आणखीही बऱ्याच योजना आहेत मनात. पण त्यावर आपण नंतर सावकाश बोलू.”
मीटिंग संपली ? विदिशांनी विचारलं.
“हो. आजच्या पुरती संपली. आता संध्याकाळी भेटू.” सरितानी समारोप केला. सगळे अपापलं काम करण्यासाठी पांगले.
विदिशानी सर्व मजुरांना एकत्र गोळा केल, त्यांचे गट पाडले. ५ एकरांमद्धे काम करणारे ३ जणं बाजूला काढले, आणि सांगितलं की “पहिली नांगरणी ट्रॅक्टर नी करून घ्या आणि मग बाकी टिलर नी करा. चला.”
“छोट्या वहिनी, ट्रॅक्टर चालवणारा नाही आला आज.” – बालाजी.
“का ? काय झालं त्याला ?” – विदिशानी कपाळावर आठ्या घालून विचारलं.
“तो रावबाजी कडे गेला.” – बालाजी.
“हे तू मला आता सांगतो आहेस ? नांगरणीची वेळ आल्यावर ?” विदिशानी विचारलं.
“आम्हाला पण रात्रीच कळलं.” – बालाजी.
“तुमच्यापैकी कोणाला येतं का चालवता ?” – विदिशा
“ मी शिकलो आहे पण तेवढंच.” रामशरण, एक परदेशी मजूर म्हणाला.
“बस ट्रॅक्टर वर. आणि आज दिवसभर शेतात नुसतं ट्रॅक्टर चालव. फक्त कोणाच्या अंगावर आणू नकोस. आज दिवसभर प्रॅक्टिस झाली की उद्या जर म्हंटलं की नांगरणी कर, तर करू शकशील का ?” विदिशा.
“हो, कर लुंगा वहिनी साहेब “ – रामशरण.
नांगरणी एका सरळ रेषेत करावी लागते, जमेल का तुला ? – विदिशा.
“त्याचीच प्रॅक्टिस करणार आहे मी वहिनीसाहेब. जमून जाईल.” – रामशरण.
“चला. एक प्रश्न सुटला. आता बाकीचे, मी शेणखत किती लागेल याची आकडेमोड केली आहे. तुम्ही ते पसरायला घ्या. उद्या नांगरणी करतांना ते नीट मिसळल्या जातं आहे की नाही ते बघा.” विदिशांनी लोकांना पिटाळलं.
मग बाकी लोकांना २० एकरांच्या पट्ट्यात घेऊन गेली आणि सांगितलं की आज तर ट्रॅक्टर मिळणार नाहीये, तर तुम्ही सरळ टिलर घ्या आणि कामाला सुरवात करा. सर्व काडी कचरा साफ करा आणि खड्ड्यात नेऊन टाका. पटापट हात चालवा.
एका मजूरानी त्याची आयडिया सांगितली. “वहिनीसाहेब, नाहीतरी तो रामशरण प्रॅक्टिस करायला सर्व शेत भर फिरणारच आहे, तर त्याला नांगराचा फाळ जोडू ना. कसाही जरी फिरला तरी जमीन तर नक्कीच उकरल्या जाईल, आणि काडी कचरा पण वरती येईल, साफ सफाई पण होऊन जाईल. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेस व्यवस्थित वाफे करता येतील. त्याला फक्त एका लाईनीत ट्रॅक्टर चालवायला सांगा म्हणजे झालं.”
विदीशाला पण ते पटलं. ती हसली आणि रामशरणला तश्या सूचना दिल्या.
खरा गोंधळ उडाला तो निशांत आणि विशालचा, त्यांना असल्या काय, कामाचीच सवय नव्हती. आज अचानक सरितानी त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती म्हणून गोंधळले होते. निशांत म्हणाला “विशाल, नेमकी कुठून सुरवात करावी ते कळत नाहीये. तू काही तरी सुचव ना.”
“विदिशाला विचारू का ?” विशाल म्हणाला.
“तिला माहीत असेल का ? मागच्या वेळी तर वहिनीनीच कुंपण घातलं होतं. नको विदिशा नको. ती परत आपली चेष्टा करेल.” निशांत म्हणाला. “त्यापेक्षा आपण वर्षालाच विचारू, ती अकाऊंटस बघते ना, तिला सर्व माहीत असेल. आणि ती सांगेल, चेष्टा करणार नाही.”
पण विशालला एकदम काहीतरी आठवलं. तो म्हणाला “ नको कोणालाच विचारायची जरूर नाही, आपण असं करू मोर्षीतले एक दोन ठेकेदार माझ्या माहितीतले आहेत. त्यांनाच विचारू.”
निशांतला पण त्यांची आयडिया पटली. म्हणाला “ चलो मिशन शुरू” दोघंही जणं मग मार्केट मधे गेले आणि एक ठेकेदाराला भेटले. त्याला शेतावर घेऊन आले. नेमकं कसं कंपाऊंड हवं आहे ते समजावून सांगितलं. मग पुन्हा त्याच्या ऑफिस मधे गेले. त्यानी एस्टिमेट दिलं. एवढं करे पर्यन्त दिवस कलला होता. मग त्यांनी विचार केला की आजचं काम तसं झालच आहे, म्हणून त्याच्या ऑफिस मधून परत शेतावर जायच्या ऐवजी ते दोघं परस्पर घरी गेले. घरून विशालनी फोन करून विदीशाला सांगितलं की त्यांचं आजचं काम झालं आहे आणि म्हणून ते दोघ शेतावर न येता, सरळ घरी आले आहेत. वर्षाला जेंव्हा हे कळलं तेंव्हा ती संतापली. ती सरिताला म्हणाली –
“वहिनी हे दोघे ठेकेदाराला भेटायला गेले आणि तिथून परस्पर घरी गेलेत. ना जातांना सांगितलं, ना इथे येऊन अपडेट दिलं. आता वहिनी यांना थोडी समज द्यायलाच पाहिजे. किती बेजबाबदारपणा हा”
“अग आजचा त्यांचा पहिलाच दिवस आहे. जरा धिराने घे. कुठल्याही नवीन सिस्टम मधे रूळायला वेळ हा लागतोच. उद्या पासून हलके हलके सतत सांगत रहा. होईल सगळं ठीक. चिंता करू नको.” सरिता म्हणाली
“ठीक आहे, मी आज घरी गेल्यावर चांगलं खडसावणार होते, पण तुम्ही म्हणता आहात म्हणून गप्प बसते. पण वहिनी, या दोघांची आरामाची सवय आपल्याला कदाचित भारी पडू शकते. आत्ता कुठे दुपारचे चार वाजले आहेत आणि हे लोकं घरी गेले ? म्हणूनच नोकरी या लोकांना आवडत नव्हती, नुसतंच म्हणत राहिले नोकरी करतो म्हणून” – वर्षा
“वर्षा, इतकी अस्वस्थ होऊ नकोस. होईल सर्व ठीक. आणि हे बघ, आपण सर्व गोष्टींवर लक्ष ठेवूनच आहोत ना, मग ? एक लक्षात घे, केंव्हाही आपण सूत्र हातात घेऊन परिस्थिती नीट वळणावर आणू शकतो. आहे ना तेवढा कॉन्फिडंस ?” सरिता शांत पणे म्हणाली.
“वहिनी, मला खरंच तुमचं नवल वाटतं. इतक्या कश्या तुम्ही शांत राहू शकता ? मला तर रागच आला होता. बरं ते जाऊ द्या, मला तुमच्याशी जरा डिसकस करायचं होतं एक दोन बाबींमधे. विदिशा पण असली तर बरं होईल. तिला बोलावून घेऊ का ? की आता ती कामात असेल ?” वर्षा म्हणाली.
ती अजून तासभर काही येत नाही. मला पण गोशाळेत थोडं काम आहे, ते आटपल्यावर आपण बसू तिघी, वाटल्यास बाबांना पण सामील करू, कारण तुझ्या बोलण्यावरून असं वाटतंय की मामला गंभीर आहे. येते मी. ” सरिता असं म्हणाली आणि गोशाळे कडे चालू पडली.
गोशाळेमधे सर्व गाई, म्हशींशी प्रेमाने बोलून, थोपटून, सरिता पुढे शेणखताकडे वळली, तिथून मग कंपोस्ट खतांच्या खड्ड्यांकडे जाऊन, सांडपाणी येतेय का ? त्याचा निचरा व्यवस्थित होतोय का वगैरे पाहणी केल्यावर, काही प्रश्न विचारले दाजीला आणि समाधानाने घराकडे वळली. पण मधेच विचार बदलून शेताकडे वळली. ट्रॅक्टरवर भलताच माणूस बघून तिने विदिशाला विचारलं की “काय प्रकार आहे हा ?” विदिशानी काय झालं ते सांगितलं, आणि म्हंटलं “वहिनी मी अजून दोघांना ट्रॅक्टर चालवायला शिकवणार आहे आणि स्वत: पण शिकणार आहे. मला अजिबात हे, कोणावर अवलंबून राहणं काही आवडत नाही. चालेल ना ?”
“परफेक्ट. विदिशा परफेक्ट. तू आता स्वतंत्र जबाबदारी घ्यायला एकदम तयार झाली आहेस. खूप छान. आवडलं मला हे.” आणि सरितानी विदिशाची पाठ थोपटली. विदिशाच्या अंगावर मूठभर मास चढलं. आणि झकास लाजली पण. विशालनी तिला आत्ता पाहिलं असतं तर तो खुळाच झाला असता.
“बरं विदिशा, जर तुझं काम संपलं असेल तर वर्षाला काहीतरी गंभीर विषयावर चर्चा करायची आहे. किती वेळ लागेल तुला ? मी निघते, तू लवकरच ये. आम्ही वाट पाहतो आहे.” असं सरिता म्हणून निघाली.
अर्ध्या तासाने विदिशा आली, दिवस भराचा आढावा घेतल्यावर, सरिता म्हणाली की –
“बोल वर्षा, तुला काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करायची होती ना ?”
“वहिनी, बाबांना बोलावू का ? ते असले तर बरं होईल असं मला वाटतं.” – वर्षा.
विदीशाने जावून बाबांना बोलावून आणलं. ते आले. म्हणाले “काय खास आहे, असा कोणता जटिल प्रश्न आहे की ज्यावर तुम्ही तिघी एका ठिकाणी बसून निर्णय घेऊ शकत नाही ?”
“हो बाबा, एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे.” वर्षा म्हणाली “ आता आपण पूर्ण तीस एकर शेती कसणार आहोत, त्या अनुषंगाने बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि त्यावर उत्तरं शोधायची आहेत. आणि त्याच बाबींमधे आम्हाला तुमचा सल्ला हवा आहे.”
“काय ग सरिता, तुला पण अडचण आली आहे ? आश्चर्य आहे. सांगून टाक, मी आलो आहे.”
“बाबा,” सरिता बोलली “मी पण तुमच्या इतकीच अनभिज्ञ आहे. मलाही काही माहीत नाहीये. वर्षांच सांगेल आता, काय प्रॉब्लेम आहे ते.
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.